|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] समाजापासून दूर राहणार्या माणसाविषयी जशा अनेक दंतकथा पसरविल्या जातात तशा जपानी हायकू कवि र्योकानविषयीही सांगितल्या जातात. कारण तोही असाच, गावापासून दूर, एकांतवासात राहत होता. सकाळच्या वेळी तो आपला कटोरा घेऊन बाहेर पडे. आजूबाजूच्या गावात जाऊन भिक्षा मागे. पोटापुरते मिळाले की तो झोपडीत परत येई. त्याच्याजवळ एक पिशवी होती. हिवाळ्याच्या दिवसात, त्या पिशवीत दहा बारा दिवस पुरेल एवढा तांदूळ जरी असला तरी त्याला तो पुरे असे. अधिक संचय त्याला मान्य नव्हता. दिवसभर तो बुद्धवचनांवर चिंतन करी, कविता लिही, चित्रे काढी. सुलेखनकलेत तो प्रवीण होता. मात्र त्या कलेचा सराव करण्यासाठी अनेकदा त्याच्याजवळ ब्रश नसत. मग तो झाडाच्या लहान फांद्या तोडून त्यांचे ब्रश तयार करीत असे. कधी बोटांनीच अक्षरे, चित्रे काढी. एका कवितेत त्याने लिहिले- त्याचे लहान मुलांवर फार प्रेम होते. तो गावात गेला की मुले त्याच्या आजूबाजूला गोळा होत, आणि कुजबुजत, “चला, खेळू, वेडा भिक्षू परत आला आहे.” र्योकानला त्यांचा राग येत नसे. ती बिचारी निरागस पोरे त्याला वेडा म्हणतात त्यांत त्यांचा काय दोष होता? मोठी माणसे आपल्याला वेडा म्हणतात ते पाहून मुलेही म्हणतात. तो हसून आपली पिशवी झाडाच्या फांदीला लटकावे, आणि खिशातला चेंडू घेऊन मुलांच्यात सामील होई. मुलांत तो रमे. त्यांच्याबरोबर दिवसभर खेळत राहण्यालाही त्याची हरकत नसे. लोक नेहमीच त्याला वेडा म्हणत नसत, कधीकधी कौतुकाने त्याला ‘चेंडू खेळणारा भिक्षू’ असेही म्हणत. त्याची कशालाच ना नसे. ही मुले त्याच्या कवितेत वारंवार येतात. एका कवितेत त्याने लिहिले, मंदिराशेजारी मुले मला पाहतात आणि माझ्याभोवती जमा होतात माझे हात ओढतात. मी माझा कटोरा एका दगडावर ठेवतो पिशवी झाडाच्या फांदीला लटकवतो प्रथम आम्ही गवताचा गोफ तयार करून रस्सीखेच खेळतो मग आम्ही चेंडू हवेत उडवतो आणि गाणे म्हणतो मी चेंडू उडवतो, ते गाणी म्हणतात ते चेंडू उडवतात, मी गाणी म्हणतो घटिका उडून जातात, वेळ विसरला जातो येणारी जाणारी माणसे मला पाहून हसतात, म्हणतात- “असे मूर्खासारखे तू काय करतो आहेस?” मी फक्त डोके हलवतो. काहीच उत्तर देत नाही मी उत्तर देऊ शकलो असतो, पण का देऊ? तुम्हाला माहीत आहे का, माझ्या मनात सुरुवातीपासून काय आहे? हेच. फक्त हेच.’ मुलांसारखे निरागस होणे... कवीच्या संदर्भात एक कथा अशी आहे-
एके दिवशी कवी घरी नसताना एक चोर त्याच्या झोपडीत शिरला. चोराला अर्थातच काही मिळाले नाही. तेवढ्यात कवी बाहेरून परत आला. चोर त्याला पाहून घाबरून पळू लागला. मात्र तो रिक्त हस्ताने परत चालला याचे कवीला वाईट वाटले. त्याने चोराला थांबविले. मात्र त्याला देण्यासारखेही कवीजवळ काही नव्हते. मग त्याने आपल्या अंगातील एकुलता एक अंगरखा त्याला काढून दिला. चोराला हे काय होते होते आहे हे समजेना. आपल्याला शिक्षा झाली नाही एवढ्यावर तो समाधानी होता, वर त्याला भेटही मिळाली. चोर निघून गेल्यावर कवीने मग या संदर्भात एक कविता लिहिली. पोषाखाच्या बदल्यात कविता हा सौदा काही कवीला महागात पडला नाही. ‘चोराने तसाच ठेऊन दिला चंद्र माझ्या खिडकीतला’ चंद्र ही झेन तत्वज्ञानात ‘साक्षात्काराची’ प्रतिमा म्हणून देखील वापरली जाते. जे आत्मज्ञान झालेले आहे त्याला बाहेरचा कुणी चोर कसा चोरून नेऊ शकणार? एका वेगळ्या पातळीवर हा हायकू वस्तूचे मोल प्रत्येक व्यक्तीनुसार कसे बदलत जाते हेही सूचित करतो. चंद्राचे भले कवीला मोल असेल पण चोराला काय त्याचे? प्रत्येकाचा चंद्र निराळा. एकाचा चंद्र दुसर्याच्या कामाचा नसतोच! हे जसे खरे तसेच हेही खरे की चंद्राचा अनुभवदेखील प्रत्येकासाठी वेगळाच असतो. योसा बुसोन या कवीने लिहिले आहे, ‘चंद्र असा की चोरानेही थांबावे आणि गाणे गावे’ -ही चंद्राची स्तुति आहे की चोराविषयीची कवीकल्पना?’ चंद्राचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो तसा प्रत्येकाला आलेला चोराचा अनुभव देखील वेगळा असतो. माझे मित्र कवि अलोन यांना चोराचा आलेला अनुभव वेगळाच होता. बाहेरच्या व्यवहारी जगात ते माधव सावरगावकर या नावाने ओळखले जात. ही सुमारे 1990 सालची गोष्ट आहे. त्यावेळी कविराज नांदेड बाहेरील एक लहानशा कॉलनीमध्ये राहत असत. कॉलनीत बहुधा पंधरा वीसच घरे असावीत. एका रात्री चोरांची एक टोळी त्या कॉलनीत शिरली. त्यांनी घरांना बाहेरून कड्या घातल्या व एकेका घरात शिरून लुटालूट करण्यास सुरुवात केली. त्या काळात कुणाजवळ मोबाइल तर सोडाच, साधे फोनही नव्हते. बाहेरची कुणाची मदत येणे सुतराम शक्य नव्हते. चोरट्यांनी अनेक घरे लुटली त्यापैकी एक कविराजांचे देखील होते. दुसर्या दिवशी ही बातमी समजल्यावर मी त्यांच्याकडे गेलो. कविराज शांतपणे पलंगावर बसले होते. पत्नी व मुलगी यांच्या चेहर्यावरचे भय अजून कमी झाले नव्हते. मी विचारले, “काही मोलाचे गेले नाही ना माधवराव?” “नाही. माझ्याजवळ त्यांना काय मिळणार? उलट रागारागाने दोन रट्टे मलाच देऊन गेले.” मग समोरच्या भिंतीतील पुस्तकांच्या कपाटाकडे हात करीत कवि शांतपणे म्हणाले, “हे धन तर माझ्याजवळच राहिले ना!”
1 Comment
Gopal Autee
3/29/2026 02:58:16 am
मजबूर नावा च्या शायर ची एक रचना आहे.
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |
RSS Feed