|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
सायग्योचा जन्म 1118 साली फुजिवारा नावाच्या प्रख्यात सामुराई घराण्यात झाला. त्याचे मूळ नाव नोरीकियो. त्याच्या घराण्यातील पुरुष हे राजाचे निष्ठावंत चाकर होते. लहानपणी नोरीकियोवर लढवय्येपणाचे संस्कार झाले. त्याच्या मनातही योद्धा बनण्याचे स्वप्न होते. खूप वर्षानी त्याने एका कवितेत आपल्या बालपणीच्या स्वप्नाना असे शब्दरूप दिले [जपान मध्ये बाल-साईग्योच्या बाहुल्या लोकप्रिय आहेत] तरुणपणी सायग्योला राजवाड्यात नोकरी मिळाली खरी पण पाच वर्षांतच, वयाच्या तेवीसाव्या वर्षी, त्याने त्या नोकरीचा राजीनामा दिला. त्याने असे का केले हे एक गूढच आहे. आजवर अनेक अभ्यासकांनी या गूढाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सायग्योने नंतरच्या काळात लिहीलेल्या कवितांचा सहसा आधार घेतला जातो. सायग्यो जन्मला त्याला आता नऊशे वर्षे पूर्ण झालेली आहेत. 12 व्या शतकातील जपानमध्ये, [अर्थात जवळपास जगातील बहुतेक देशात] प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनाविषयी काही लिहून ठेवले जाणे हे दुर्मिळ होते. सायग्योबद्दल आज जी माहिती आहे ती अनेकांनी सांगितलेल्या मौखिक आठवणीवर आधारित आहे किंवा त्याच्या संबंधीच्या अनेक आख्याइकांवरून संकलित केलेली आहे. किंवा त्याच्या कवितेतील स्वत:संबंधीच्या उल्लेखावरून अनुमान लावलेली आहे. [कवीच्या कवितेतील ‘मी’ आणि खरा ‘मी’ हे एकच असे ग्रहित धरणे चुकीचे आहे असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे.] राजाश्रय सोडण्याच्या सायग्योच्या या निर्णयानंतरचे तपशील सुद्धा आज ज्ञात नाहीत. उदाहरणार्थ भिकखू होण्याची दीक्षा त्याने कोणत्या मंदिरात व केव्हा घेतली याची कुठेच नोंद नाही. मात्र एवढे खरे की त्या काळातील बहुतेक भिकखूप्रमाणे त्याने एखाद्या मठात वा मंदिरात कायमचे राहण्याचे नाकारले. तो सतत मठांपासून काहीसे अंतर ठेऊन पर्वतात, रानावनात फिरत राहिला. बहुतेक वेळा त्याचा निवास स्वत: तयार केलेल्या लहानशा, फक्त एक माणूस राहू शकेल एवढ्याच, झोपडीत असे. तो ज्या मठाजवळ असे तेथील लोक त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करीत आणि त्या बदल्यात तो गावोगाव फिरून मठासाठी देणग्या गोळा करी. अशा प्रकारे त्याने जवळजवळ सार्या जपानची परिक्रमा केलेली आढळते. त्याच्या काळातला तो सर्वाधिक प्रवास केलेला प्रवासी मानला जातो. सायग्योने आपले शहर सोडले आणि त्यानंतर सुमारे पन्नास वर्षे तो जपानमध्ये हिंडत राहिला. एका ठिकाणी राहण्याचे त्याने नाकारले. त्याच्या मनाला जणू जबरदस्त ‘प्रवास भूल’ पडलेली होती. या प्रवासातच एकदा त्याने चेरीचा बहर पाहिला आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. अनेक कवींनी चेरीच्या बहरावर कविता लिहिल्या आहेत पण सायग्योचे त्यावरील प्रेम काही विलक्षणच होते. त्याने चेरी बहराच्या संदर्भात दोनशेहून अधिक कविता लिहिल्या आहेत. एकीकडे जगापासून दूर जाण्याची, बुद्धाच्या तत्वज्ञानात जीवनाचा अर्थ शोधण्याची त्याची मनीषा आणि दुसरीकडे या नश्वर सौंदर्यात भान हरवून गुंग होणे यात वरवर पाहता विरोधाभास दिसतो पण तो तसा नाही. त्याचे या बहराविषयीचे आकर्षण हे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेले होते. त्यांच्यात, पर्यायाने निसर्गात तो बुद्धाचे अस्तित्त्व पाहत होता. त्याच्यालेखी निसर्गातील सौंदर्याचा शोध आणि बुद्धाचा शोध हे एकच होते. निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे म्हणजे मनाच्या एका उन्नत, भ्रममुक्त, ज्ञानी अवस्थेचे वर्णन करणे होय आणि म्हणूनच त्याच्या प्रेमात पडणे म्हणजे ‘योग्य मार्गावरील’ एक पाऊल आहे अशी त्याची धारणा होती. एका ठिकाणी त्याने लिहिले आहे- ‘मी संपूर्ण वसंत ऋतुत या फुलांकडे केवळ पाहत राहू इच्छितो.’ विशेषत: योशिनो पर्वतावरील चेरी बहर त्याच्या फार आवडीचा होता. ‘एकटा प्रवास करताना मला जाणवत नाही माझ्या हृदयाचे धडधडणे ते मागेच राहिले आहे जेथे मी चेरीबहर पाहिला होता’ चेरीचा बहर संपत आला तरी कवीचे मन काही भरत नाही. तो उरलीसुरली फुले शोधू लागतो. आणि एका वृद्ध वृक्षावरली फुले पाहताना त्याच्या ध्यानात येते, बहर जसा क्षणिक आहे तसेच आपले आयुष्य देखील आहे. ‘आता किती वसंत उरलेत फुलायचे?’ तो विचारतो ‘मला शोधायला हवी काही उरली सुरली फुले या वृद्ध वृक्षाने जपलेली आम्ही सारखेच आहो- आणखी किती वसंत उरलेत फुलायचे? मात्र कवीला सतत ‘पुढे’ जाण्याची ओढ आहे, ही प्रवासभूल त्याला एका ठिकाणी, ते कितीही मोहक असले तरी, थांबू देत नाही. त्याने आपल्यासाठी ‘सायग्यो’ हे जे टोपण नाव निवडले त्याचा अर्थ ‘पश्चिम-प्रवास’ हा आहे. ‘हा चंद्र असाच रात्रीमागून रात्री प्रकाशत राहील माझ्या या गवती झोपडीवर मला मात्र निघायला हवे. सायग्यो आजदेखील जपान मधील सर्वाधिक लोकप्रिय कवींपैकी एक आहे याचे कारण त्याच्या कविता या त्याच्या समकालीन जपानी कवितेपेक्षा फारच वेगळ्या होत्या. चीनी कवितेकडून उसने घेतलेले विचार आणि आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ दृष्टीकोण यांच्यापासून जपानी कवितेला त्याने मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचे समकालीन कवी शाब्दिक खेळात रमलेले होते. त्याला या खेळात रस नव्हता. कवितेची भाषा अनलंकृत असावी यावर त्याचा कटाक्ष असे. त्याच्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी जपानमध्ये जो हायकू हा काव्यप्रकार उदयाला आला [त्यावेळी त्याचे नाव होक्कू असे होते.] त्याच्या उदयास सायग्योची कविता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होती असे मानले जाते. बौद्ध तत्वज्ञानाचा त्याच्या काव्यावर प्रभाव असणे हे साहजिक होते पण ते तत्वज्ञान क्लिष्ट स्वरूपत त्याच्या काव्यात कधीच अवतरत नाही, तर ते सूचकतेने व प्रतिमांच्या भाषेत मांडले जाते. Mono no aware[जीवनाच्या नश्वरतेची जाणीव], त्याबद्दलचे दू:ख आणि हेच आयुष्याचे सत्य आहे ही खोलवर रुजलेली जाण, Sabi [एकाकीपणा] आणि Kanashii [उदासीनता] हे त्याच्या काव्याचे महत्त्वाचे घटक होते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ही जाण कवीच्या मनात सतत आहेच तरी याबद्दल त्याची तक्रार नाही, उलट ते तसेच असायला हवे असेही त्याला वाटते. आयुष्य क्षणभंगुर असल्याची भावना, जी पुढे हायकूचा एक महत्त्वाचा भाग बनली ती येथे बीजरूपाने आढळते. ‘क्षणात दिसले, क्षणात अदृश्य फुलपाखरू उडताना कुंपणाने वेढलेल्या फुलांमधून- असेच आयुष्य हवे, जरी ते असेल क्षणात दृश्य, क्षणात अदृश्य ... 1170 साली सायग्योने ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती. ‘माझी इच्छा आहे वसंत ऋतूत मला मृत्यू यावा चेरीचा बहर फुललेला असताना वर्षाच्या दुसर्या महिन्यात आकाशात पूर्ण चंद्र असताना.’ पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल!
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed