|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकूंचा शोध घेत असताना मी थोडा आजूबाजूलाही, जपानी कवितेच्या मुलूखात फिरत होतो. त्यावेळी जपानच्या समृद्ध काव्य परंपरेचे विलक्षण दर्शन मला घडले. 13 व्या शतकापर्यंत तांका हाच जपान मधील सर्वांत लोकप्रिय असा काव्यप्रकार होता. इ.स.च्या सातव्या शतकात जपानमधील सुशिक्षित वर्ग हा आपल्या भावना कवितेतून व्यक्त करू लागला होता. अर्थात हा सुशिक्षित वर्ग मुख्यत: उच्च वर्णीय -राजे रजवाडे, सरदार, आणि धनिक- असल्यामुळे समाजाच्या खालच्या स्तरातील लोक या कवीमध्ये सहसा आढळून येत नाहीत. हे उच्च वर्णीय लोक वेगवेगळ्या सामाजिक समारंभांच्या वेळी आपल्या कविता सादर करीत. या काळात कवितेला उत्तम राजाश्रय देखील होता. राजाच्या दरबारात वेळोवेळी कवितांच्या स्पर्धा घेण्यात येत. राजे, राणी, त्यांचे कुटुंबिय देखील अनेकदा स्वत: कविता सादर करीत. त्या काळाच्या रितीरिवाजाप्रमाणे जपानमध्ये आपसात नाते नसलेले उच्चवर्णीय स्त्री पुरुष एकमेकांशी मोकळेपणी बोलू शकत नसत. म्हणून ते बहुसंख्य वेळा पत्रांतून एकमेकांशी संपर्क करीत आणि ‘तांका’ हे त्या पत्रांचे अविभाज्य अंग असे. ही मंडळी ‘सुसंस्कृत’ असल्यामुळे सहसा या कवितेतून अभिरुचिहीन विचारांचे चित्रण केले जात नसे. अनेकदा प्रेमभावना स्पष्टपणे न मांडता आडवळणाने मांडल्या जात त्यामुळे आपोआपच योजल्या गेलेल्या प्रतिमांमुळे या पत्रांतील लेखन काव्याच्या पातळीवर जात असे. जपानी भाषाही या पद्धतीच्या लिखाणाला पूरक होती. उदा. जपानी भाषेत ‘मात्सु’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, ‘पाईनचा वृक्ष’ आणि दूसरा ‘वाट पाहणे’. त्यामुळे कवितेत पाईन वृक्षाचे वर्णन करणार्या कवीला ‘मी तुझी वाट पाहतो आहे’ असेही सुचवायचे असे. ‘समुद्र हे पर्वताला गिळून टाकू शकत नाहीत’ असे जेव्हा एखादा कवि लिही तेव्हा त्याचा अर्थ ‘कुठलीही शक्ति माझ्या प्रेमाचा नाश करू शकत नाही’ असाही असे. हरिणाचे ओरडणे हे उदासीनतेची प्रतिमा मानली जात असे. की सेन हा कवि लिहितो, ‘माझी भिख्खूची झोपडी शहरापासून दूर सोबत फक्त एक हरीण. पर्वतातील घर, माणसे सोडून गेलेली’ या कवितांपैकी बर्याचशा कविता ही ‘निसर्ग काव्ये’ असली तरी त्यापैकी अनेक कवितांत मानवी भावना, विशेषत: प्रेमभावनांचे सूचन केलेले असे. कधीकधी निसर्ग आणि मनातील प्रेमभावना यांची सांगड देखील घातली जात असे. मिबू नो तादामिने [860-920] ची एक कविता आहे- ‘गारठलेली सकाळ क्षीण चंद्र सोबतीला कुणी नाही विरहात उगवणार्या दिवसाइतके प्रेमहीन काहीच नाही' कधी कधी निसर्गाचा संदर्भ न घेताच देखील प्रेम व्यक्त केले जात असे. निसर्गवाचक शब्द हा कवितेचा एक आवश्यक भाग नंतरच्या काळात मानला गेला. एक कवयित्री लिहिते- ‘जर तू मण्यांची माळ असतास तर तुला मनगटाभोवती बांधले असते- पण या ऐहिक जगात तू पुरुष आहेस वळविण्यासाठी अवघड’ मात्र जसजसा ‘तांका’ हा काव्य प्रकार लोकप्रिय बनू लागला तसतशी आपल्याला जे सांगायचे आहे ते वाचकांनी ओळखावे म्हणून ते धूसर ठेवण्याची प्रथाही या काळात सुरू झाली. ओटोमो नो याकामोची हा कवि लिहितो- ‘माझ्या शरीराचे हे फोलपट बिनमहत्त्वाचे आहे मी पाहतो आहे पर्वत आणि नद्यांकडे शोधतो आहे माझा मार्ग’ हा मार्ग ऐहिक प्रवासातला मार्ग असू शकतो किंवा आत्मिक मार्गही. ही संदिग्धता काव्याला अधिक मनोरम बनविते. एक अनामिक कवी लिहितो- ‘माझे प्रेम, माझा तिरस्कार किती निरर्थक.. शरदातल्या उत्तररात्री एकट्याने पावसाचा आवाज ऐकताना’ इ.स. 905 च्या सुमारास जपानचा राजा दियागो याने अनेक मान्यवर व्यक्तींना बोलावून जपानी कवितांचा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह तयार करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपविली. हे संकलन तयार करणार्यापैकी की नो त्सुरायुकी हा स्वत: एक उत्तम कवि होता. त्याने या संकलनाला सुरेख प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत तो लिहितो- ‘जपानमधील कवितेचे बीज हे मानवी हृदय असून शब्द ही तिची पाने आहेत. जेव्हा माणसे आजूबाजूला जे पाहतात किंवा ऐकतात त्याने प्रभावित होतात, किंवा आपल्या आयुष्यातील घटनाबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप द्यावेसे त्यांना जेव्हा वाटते तेव्हा कविता निर्माण होते. पाखरांचे गाणी म्हणणे, तलावातील बेडकांचे आवाज करणे, आपल्याला शिकविते की पृथ्वीवरील सर्व प्राणी गाणे गाऊ शकतात. ही गाणी स्वर्ग आणि पृथ्वीलाही सहज हलवू शकतात, स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात सुसंवाद आणू शकतात आणि शूर योद्ध्यांच्या हृदयांना कोमल बनवू शकतात.’ या कविता संकलनात स्त्रियांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. ओनो नो कोमाची [834-880] ही त्यापैकी एक महत्त्वाची कवयित्री. ती तिच्या कवितेइतकीच तिच्या अप्रतिम लावण्याबद्दल प्रसिद्ध होती. तिच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की तिला मागणी घालणार्या एका तरुणाला तिने अशी अट घातली की जर तो सलग शंभर रात्री तिच्या घरासमोर दिवस उगवेपर्यंत उभा राहिला तर ती त्याच्याशी लग्न करील. असे म्हणतात की तो नव्व्यानवव्या दिवशी मरण पावला. कोमाचीची एक प्रसिद्ध कविता आहे- ‘मानवी हृदयाच्या फुलांचा रंग फिका होत जातो या जगात कसल्याही बाह्य कारणाशिवाय.’ फुजिवारा नो तेईका हा या परंपरेतील एक महत्त्वाचा कवि मानला जातो. तो एक उत्तम कवी तर होताच पण याबरोबरच त्याने जपानी कवितेच्या अभ्यासकांसाठी फार मोठे कार्य करून ठेवले आहे. इ.स. 1237 च्या सुमारास त्याने ‘हायकुनीन इस्शू’ या नावाचा एक काव्यसंग्रह तयार केला. या संग्रहात त्याने सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतच्या निवडक 100 कवींच्या प्रत्येकी एक अशा 100 कविता एकत्रित केल्या. हे एक ऐतिहासिक कार्य होते. हा संग्रह अतीशय लोकप्रिय तर झालाच पण आज देखील त्याच्या नव्या नव्या आवृत्त्या निघत असतात व जपानी कवितेचा अभ्यास करणार्यांसाठी तो अत्यावश्यक असा ग्रंथ मानला जातो. हा संग्रह इतका लोकप्रिय झाला की त्याच्यावरून एक नवा ‘कार्ड-गेम’ तयार करण्यांत आला. या खेळात प्रत्येक कवितेच्या पाच ओळींची विभागणी दोन कार्डात केली जात असे. एका कार्डावर पहिल्या तीन ओळी लिहिल्या जात व दुसर्यावर नंतरच्या दोन. अशी 100 कवितांची दोनशे कार्डे तयार केली जात. ही कार्डे एकमेकात मिसळून ज्याच्या वाट्याला पहिल्या तीन ओळी येतील त्याने शेवटच्या दोन ओळी शोधून कविता पूर्ण करायची, असा हा खेळ होता. त्यात पारंगत होण्यासाठी पाठांतर व कवितेची जाण या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. या काळात तांका काव्य इतके लोकप्रिय झाले होते की या कवितांचे wood-block prints काढले जात. त्या कविता घर सजवटीसाठी वापरल्या जात, इतकेच नव्हे तर कपड्यांवर देखील लिहिल्या जात. या संग्रहाचा माझ्याजवळ असलेला इंग्रजी अनुवाद Frank Watson याने ‘One Hundred Leaves’ या नावाने केला आहे. या संग्रहात कविता त्यांच्या प्रकाशनाच्या कालक्रमानुसार संग्रहित केल्या असल्यामुळे जपानी कवितेचा इ.स. 1300 पर्यंतचा विकास अभ्यासण्यासाठी त्याची फारच मदत होते. या पुस्तकातील पहिली कविता ही एंपरर तेंची [इ.स. 623-671] याने लिहिलेली आहे. ‘कापणीचा हंगाम कशीबशी शाकारलेली झोपडी हिवाळ्याचा आसरा माझी बाही दवाने ओली’ (ओली बाही हे दु:खी मनाचे प्रतीक मानले जाते.) काळ हातून निसतात चालला असल्याची विषण्ण करणारी भावना ओनो नो कोमाची [825-900] याने त्याच्या खालील कवितेतून मांडली आहे. ‘थरथरणार्या फुलाचा चेहरा सुकला आहे मी शून्यपणे पाहत राहतो जग वृद्ध होत जाते पाऊस पडत राहतो’ ढगांच्या आकारात आपल्या मनाचे आकार शोधणे हा प्राचीन काळापासून कवींचा आणि कवीमनाच्या रसिकांचा छंद आहे. हेन झौउ [काळ अनिश्चित-सुमारे आठवे शतक] याची ही कविता आधुनिक काळातील भावकवितेशी किती जवळचे नाते सांगते!- ‘वायु लहरींनो ढगांना विसकटणारे तुमचे वाहणे कृपया थांबवा मला दिसणारा तिचा चेहरा पाहू द्या आणखी काहीकाळ’ काही कवितांमधून कवीच्या मनात भळभळणारे दु:ख ठळकपणे प्रकट होताना दिसते- अरिवारा नो युकीहीरा [818-893] लिहितो- ‘दूर आहो आपण एकमेकांपासून पण जर मला तुझे शोकगीत ऐकू आले- मी लगेच परत येईन किंवा जीव देईन’ आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहण्याची भावना अनेक कवितांमधून व्यक्त झालेली दिसते. सोसेइ होशी हा कवि लिहितो- ‘मी येते’ असे तू म्हणाली होतीस म्हणून मी वाट पाहत राहिलो या दीर्घ दिवसांत सकाळच्या चंद्राची’ ओशिकोची नो मित्सुने [859-925] याची एक रचना आहे- ‘मन गोंधळले आहे माझे- मोसमातील पहिल्या धुक्याने संभ्रमाची चादर पसरली आहे पांढर्या शेवंतीवर... मी फुले तोडू शकेन तर योगायोगानेच’ हे एक सुंदर असे निसर्गदृश्य आहे. धुके, संभ्रम, पांढरी शेवंती या सार्यांना अर्थाचे दुहेरी पदर आहेत. प्रत्येकाने ते आपल्या मनात उलगडू पहावेत. मनातही कदाचित संभ्रमाचे धुके साचेल, पण ते हवेहवेसे असेल यात शंका नाही. हरूमीची नो त्सुराकी [मृत्यू 920] ची एक सुरेख रचना- ‘पर्वतातील झर्यात पूल तयार केला आहे या वार्याने मेपलच्या पानांचा प्रवाह अडवणारा’ दर्याखोर्यातून भ्रमण करणार्या वाटसरूला दिसणारे एक नेहमीचे दृश्य. पानगळीचा मोसम आहे. वार्याने मेपलच्या झाडांची पाने गळून पडताहेत ती खालच्या वाहणार्या झर्यात. प्रवाह अडला आहे. पण या पानांनी फक्त अडविण्याचे काम केलेले नाही, त्यांनी एक पूल देखील तयार केला आहे. हा पूल आहे ‘पलीकडल्या’ तीरावर जाण्यासाठी... गळून पडणारी पाने हा वाटसरूचाही ‘प्रवास’ संपण्याचा तर संकेत नसेल?
तांका कवितेतील 5 ओळींची आणि 31 ओनची रचना नेमकी केव्हा दोन विभागात विभागली जाऊन तिचा 17 ओनचा भाग ‘स्वतंत्र’ झाला ते सांगता येत नसले तरी ही प्रक्रिया अकराव्या शतकात सुरू झाली असे मानले जाते. तिच्याविषयी पुढील भागात.
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed