|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जपानी साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय व जगभर पसरलेला काव्यप्रकार म्हणजे हायकू. पण हायकूशिवायही जपानी साहित्यात बरेच काही अप्रतीम लेखन आहे जे गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, अनुवादाद्वारे, सर्वदूर पोहोचले आहे. या साहित्यापैकी ‘हायबन’ नावाचा एक साहित्यप्रकार मात्र थोडासा अलक्षित राहिला आहे. या प्रकारच्या लेखनाची सुरुवात प्रथम मात्सुओ बाशो [1644-1694] या कवीने लिहीलेल्या ‘The Long Road to Deep North’ या पुस्तकाने झाली असे मानले जाते. 1689 साली बाशो हा त्याचे गाव सोडून सुदूर उत्तरेकडील हिराझुमी या गावी जाण्यास निघाला, आणि जवळजवळ दोन वर्षानी 1691 मध्ये तो परत आला. हा सुमारे 2400 की.मी.चा प्रवास त्याने पायी केला. या प्रवासाची, हिराझुमी व इतर अनेक गावांत केलेल्या वास्तव्याची कहाणी त्याने या पुस्तकात वर्णन केली आहे. या लेखनात त्याने एक अभिनव पद्धत वापरली. हे एक प्रवासवर्णन तर आहेच, तसेच ती त्याने अनेक ठिकाणी केलेल्या वास्तव्यातील अनुभवांची कहाणीही आहे. त्यांत निसर्गवर्णने आहेत, भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रे आहेत, त्यांत त्याचे स्वतत्र हायकू आहेत, मुक्त चिंतनपर गद्य आहे, डायरी आहे, त्याने लिहिलेली व त्याला आलेली पत्रे आहेत, त्याने वाचलेल्या प्रसिद्ध कवींच्या कविता आहेत, इतरांचे हायकू आहेत, त्यावरचे भाष्य आहे, एवढेच नव्हे तर त्याने काढलेली चित्रेही आहेत. गद्य आणि काव्य यांच्या या ललित मिश्रणाला त्याने ‘हायबन’ असे नाव दिले. हे पुस्तक अमाप लोकप्रिय झाले. बाशोनंतर अनेक कवींनी, चिंतकांनी, प्रवाशांनी या प्रकारच्या रचना केल्या. या डायरीची सुरुवात बाशोने एका अत्यंत काव्यात्म परिच्छेदाने केली आहे- ‘दिवस आणि महीने हे अनंताचे प्रवासी आहेत. वर्षे येतात आणि जातात-तीही प्रवाशांसारखी. जे आपले आयुष्य जहाजावर तरंगत घालवितात किंवा घोड्यावरून सफर करीत जे म्हातारे होतात तेही प्रवासीच असतात. ते जेथे जातात ती जागा त्यांचे घर असते. अनेक वर्षांपासून, जेव्हा मला एखादा ढग आकाशात वायु लहरीवर तरंगत जाताना दिसतो, तेव्हा सारे सोडून प्रवासाला निघण्याची अनिवार उर्मि माझ्या मनात निर्माण होते.’ 2024 साली अमेरिकेत आल्यावर हे पुस्तक पुन्हा वाचण्यात आले. अचानक मनात कल्पना आली की अशा प्रकारेच आपले अनुभव का शब्दबद्ध करू नयेत? आणि मी टिपणे लिहावयास सुरुवात केली. काही दिवसांनंतर मी भारतात परत आलो. पण येथे आल्यावर देखील हा टिपणे लिहिण्याचा संकल्प मी मोडला नाही. त्या नोंदीपैकी ही एक नोंद- पहिल्यांदा जेव्हा आम्ही अमेरिकेत मुलाकडे आलो तेव्हा तो न्यू जर्सी येथे होता. पहिली अमेरिका भेट. त्यावेळी कोठे जायचे, कोणत्या ठिकाणांना भेटी द्यायच्या याची यादी वगैरे तयार होती. न्यू यॉर्क मधील अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर मुलाने एके दिवशी वीक एंडला नायगरा धबधबा पाहण्याची योजना आखली. मी तयारच होतो. भारतात राहून देखील अमेरिकेतील ज्या ठिकाणांची बरीच माहिती होती त्यापैकी एक हा धबधबा हे ठिकाण होते. या संदर्भात नेटवर बरेच तपशील उपलब्ध होते, काही विडिओ, बरीचशी चित्रे पाहिली होती. अनेकांनी पाहिली असतील. [त्यामुळे धबधब्याचे मी काहीच वर्णन करणार नाही] पण प्रत्यक्षात जेव्हा त्या धबधब्याचा प्रचंड विस्तार पाहिला तेव्हा मला आपल्या कल्पनादारिद्र्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. चित्रपट आस्वादाचे, अभ्यासण्याचे दिवस जीवनात आले तेव्हा कळत नकळत एक सवय लागली – प्रत्येक दृश्य भोवतीच्या चौकटीसह पहायचे, चौकटीच्या संदर्भात त्याचा अर्थ शोधायचा, आतील घटकांचा विचार देखील तिच्याच संदर्भात करायचा.आपल्या मनाचीही एक मर्यादा असते. समोरचे विश्व आकलन होण्याची. समोरचा अवकाश जर नजरेच्या परिघात मावत नसला तर त्याचे विश्लेषणही आपल्याला करता येत नाही. अविरत कोसळणारा तो जलप्रपात पाहून ‘अफाट, अफाट’, असे किती वेळा म्हणणार? तेव्हा काही बोलूच नये. नजरेत तो धबधबा मावत नव्हता म्हणून शेवटी कॅमेर्याचा आधार घेतला. पण हा आधार कृत्रिम आहे हा विचार मनाला टोचत होताच. अर्थात कॅमेर्याची मर्यादाहि लवकरच ध्यानात आली. त्याच्या view finder मधून देखील जेवढे दिसते त्यावरच समाधान मानावे लागत होते. व्हीडिओ काढला तरी तेच. ते प्रतिक्षणी उंचावरून खाली उडी मारणारे लाखो गॅलन पाणी, खालच्या पाण्यावर ते कोसळतांना तयार होणारा शुभ्र फेस, खालच्या पाण्यावर वरचे पाणी पडताना होणारा रौद्र भीषण ध्वनि, आणि या सार्यांना सौंदर्याचा आणखी एक दैवी स्पर्श देणारे, पाण्यावर सूर्यप्रकाश पडल्याने तयार झालेले इन्द्रधनुष्य ! हे काहीच कॅमेर्यात पकडले जात नव्हते. मी काही फोटो काढले व कंटाळून कॅमेरा बंद करणार एवढ्यात मला view finder मधून काहीतरी दिसले. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर कसला तरी एक काळा डाग दिसत होता. मी ते दृश्य झूम करून पाहिले. तो चक्क एक पक्षी होता! माझ्या नजरेवर माझा विश्वास बसेना. पण तो उडणारा पक्षी चौकटीच्या बाहेत जाऊ नये म्हणून मी पटकन त्याचे दोन तीन फोटो काढले. कॅमेरा बंद करून नुसत्या चर्म-चक्षुनि पाहिले. काहीच दिसत नव्हते. ‘मत रहना अखीयों के सहारे’ लिहिणार्या शैलेन्द्रची मला आठवण झाली. आम्ही सामान्य माणसे, ‘आखीयोंके झरोकों से’ पाहणारी. पण मन खरे थरारले ते रात्री संगणकावर तो फोटो टाकून, मोठा करून पाहिल्यावर. ते इवलेसे पाखरू केवढ्या आत्मविश्वासाने त्या धबधब्याला आव्हान देत पुढे सरकत होते! मला अतिविस्तीर्ण वाटणारा जल-विस्तार त्याच्या खिजगिणतीत देखील नव्हता. त्याला तो दिसत असावा पण त्याला आपल्या ठरलेल्या ठिकाणी जायचे होते. त्याला एका बाजूच्या पडणार्या प्रपाताची जाणीव नव्हती, खालच्या खोलीकडे ते पाहतही नव्हते. त्याची दृष्टी फक्त समोर होती आणि जेथे जायचे तेथे आपण जाणार हा विश्वास त्याच्या मनात होता. मला जी,एंच्या ‘स्वामी’ मधील वाक्य आठवले, ‘आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर त्याला तू आतिथ्य दाखव, कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.’ जरी ते पाखरू माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नव्हते तरी मी विचारले, ‘पाखरा, तुझ्यातला थोडा आत्मविश्वास मला देशील का?’ प्रश्न मीच विचारला, उत्तर मलाच द्यावयाचे आहे. उत्तर कसे देणार? मी काही पाखरू नाही. घरी परत आलो तरी धबधबा आणि तो पक्षी मनातून जात नव्हते. कितीतरी दिवस रोज एकदा तरी संगणक उघडून त्या फोटोकडे पहायचो. पाहताना नवे नवे विचार मनात यायचे. एकदा वाटले, आपण त्या पाखराकडे कौतुकाने पाहतो आहो, तसेच कौतुक धबधब्यालाही वाटत असले पाहिजे. कोसळणारा धबधबा कौतुकाने पाहतो जवळून उडणार्या पाखराकडे धबधब्याला आणि मला कौतुक करीत बसायला खूप वेळ आहे. पाखराजवळ कोठे आहे इकडे तिकडे पाहायला वेळ? त्याचे लक्ष्य एकच : समोर कोठेतरी पाय टेकण्यास जागा सापडेपर्यन्त उडत राहणे...
शेवटचा श्वास घेइपर्यंत आपलेही लक्ष्य लिहीत राहणे हेच हवे
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed