|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जपानी हायकू कवींचे दोन अत्यंत आवडते विषय आहेत. एक, चेरीचा [किंवा प्लमचा] बहर आणि दूसरा, पौर्णिमेचा चंद्र. अगदी काही आधुनिक कवि सोडले तर 19 व्या शतकापर्यंत जवळजवळ प्रत्येक कवीने या विषयांवर हायकू लिहिले आहेत.विषय निघाला आहे तर आज ‘चंद्रावरचे काही हायकू’ पाहू. मात्सुओ बाशोचा एक गाजलेला हायकू आहे. दार उघडा चंद्राला येऊ द्या मंदिरात असे म्हणतात की बाशो एका पौर्णिमेच्या रात्री मठात झोपण्यासाठी गेला होता. तेथील कर्मचार्यांनी रात्रीची प्रार्थना झाल्यावर मठाचे दरवाजे लावून घेतले. त्यावेळी त्याने हा हायकू लिहिला. पण अशा आख्यायिका अनेक असतात. खरे सांगावयाचे तर हा हायकू लिहिण्यासाठी कवीला ‘प्रत्यक्ष’ त्या अनुभवाची काहीच गरज नव्हती. चंद्राला पाहून काहीजण वेडे होऊन रात्रभर फिरतात हे जसे त्याला माहीत आहे तसेच काहीजण खिडकी लावून घेतात हेही. अशा माणसांसाठीच तर त्याने एकदा लिहिले होते- चांदण्यात शांतपणे एक किडा झाडाचे खोड पोखरतोय आणखी एका हायकूत बाशोने स्वत:विषयी लिहिले- लखलखता चंद्र तळ्याकाठाने मी फिरतोय अरे, पहाट झाली की कवीला चंद्राचे आकर्षण. आणि चंद्राला? पृथ्वीवरल्या चेरी बहराचे. अशी विलक्षण कल्पना असणारा बाशोचा एक हायकू आहे चंद्र रेंगाळतो आहे रात्रीच्या आकाशात चेरीचा बहर निरखीत बुसोन [1716-1784] हा श्रेष्ठ हायकू कवि लिहितो एकटाच आहे मैत्री करावी म्हणतो चंद्राशी चंद्राइतका प्रेमळ मित्र कवीला कोठे मिळणार? चांदण्यात फिरताना कधी कधी गमतीदार गोष्टीही घडतात- [विनोदाचे हायकूला वावडे नसते.] बुसोन एका हायकूत लिहितो चांदण्यात फिरताना एका आंधळ्याने धडक दिली आणि तो हसला ज्याला डोळे आहेत असा माणूसही आंधळ्यासाखा फिरतो आहे, आपल्याला धडक देतो आहे हे पाहून आंधळा हसणारच ना! जपानच्या चार श्रेष्ठ हायकू कवींपैकी एक, कोबायाशी इस्सालाही सामान्य माणसांचे ‘चंद्र-दुर्लक्ष’ ठाऊक आहे. तो लिहितो- काहीजण स्वागत करतात घोरण्याने- पौर्णिमेच्या चंद्राचे मी माझ्या एका हायकूत असेच काही मांडले होते- ज्याचात्याचा चंद्र ज्याच्यात्याच्या आकाशाएवढा इस्साला हेही ठाऊक आहे. म्हणून तो लिहितो- पूर्ण चंद्र प्लमच्या सुवासात गुंफलेला फक्त माझा चंद्र जेव्हा आपला असतो तेव्हा इतरांच्या प्रतिक्रियेची गरजच नसते. जपानमध्ये ‘चंद्र पाहण्याची’ एक प्राचीन परंपरा आहे. पौर्णिमेच्या रात्री कवी आणि रसिक मोठ्या संख्येने चंद्र पाहण्यास घराबाहेर पडतात. ‘चंद्र पाहून’ घरी परत आल्यानंतर कवयित्रि चियो-नी लिहिते- चंद्र पाहून परतल्यानंतर नि:शब्द ट्रेसी डेव्हिडसन लिहिते- उबदार चंद्र मी झटकून टाकते लोकरी पांघरुणे एक भारतीय कवी जगजीत सलाम लिहितो- शांत तलाव मी घेऊन येतो बादलीभर चंद्र चंद्राची मोहिनी माणसाच्या अबोध मनालाही पडत असावी. लहानपणापासून मुले या दैवी गोलाच्या प्रेमात पडलेली असतात. अनेक भारतीय भाषांतील कवितात देखील चंद्र आणि मुलांचे सख्य वर्णन केले आहे. यासुको त्सुशिमाचा एक अप्रतिम हायकू आहे- झोपेतच चेहरा वळविते माझे मूल चंद्राकडे कोण अधिक निरागस? चंद्राकडे चेहरा वळविणारे मूल की ते न्याहाळणारा कवी... मराठी रसिकांना सहज आठवेल ग. दि. माडगूळकरांचे हे अजरामर भावगीत – ‘चांद मोहरे, चांदणे झरे झोपेतच गाली असा हसशी का बरे.. माझ्या ‘हायकूऋतू’ या हायकू संग्रहाची सुरुवात मी चंद्राच्या हायकूनेच केली आहे चंद्र घेऊन आला चकोरासाठी चांदणे माझ्यासाठी हायकू हायकू हा काव्य प्रकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपाससून जपानी कवी चंद्रावर कविता लिहीत आलेले आहेत. इ.स.च्या 12 व्या शतकातील एक उत्कट कवी सायग्यो याचे चेरी बहरावर आणि चंद्रावर अतिशय प्रेम होते. 1170 साली त्याने ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती. माझी इच्छा आहे वसंत ऋतूत मला मृत्यू यावा चेरीचा बहर फुललेला असताना वर्षाच्या दुसर्या महिन्यात आकाशात पूर्ण चंद्र असताना. पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल!
1 Comment
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] समाजापासून दूर राहणार्या माणसाविषयी जशा अनेक दंतकथा पसरविल्या जातात तशा जपानी हायकू कवि र्योकानविषयीही सांगितल्या जातात. कारण तोही असाच, गावापासून दूर, एकांतवासात राहत होता. सकाळच्या वेळी तो आपला कटोरा घेऊन बाहेर पडे. आजूबाजूच्या गावात जाऊन भिक्षा मागे. पोटापुरते मिळाले की तो झोपडीत परत येई. त्याच्याजवळ एक पिशवी होती. हिवाळ्याच्या दिवसात, त्या पिशवीत दहा बारा दिवस पुरेल एवढा तांदूळ जरी असला तरी त्याला तो पुरे असे. अधिक संचय त्याला मान्य नव्हता. दिवसभर तो बुद्धवचनांवर चिंतन करी, कविता लिही, चित्रे काढी. सुलेखनकलेत तो प्रवीण होता. मात्र त्या कलेचा सराव करण्यासाठी अनेकदा त्याच्याजवळ ब्रश नसत. मग तो झाडाच्या लहान फांद्या तोडून त्यांचे ब्रश तयार करीत असे. कधी बोटांनीच अक्षरे, चित्रे काढी. एका कवितेत त्याने लिहिले- त्याचे लहान मुलांवर फार प्रेम होते. तो गावात गेला की मुले त्याच्या आजूबाजूला गोळा होत, आणि कुजबुजत, “चला, खेळू, वेडा भिक्षू परत आला आहे.” र्योकानला त्यांचा राग येत नसे. ती बिचारी निरागस पोरे त्याला वेडा म्हणतात त्यांत त्यांचा काय दोष होता? मोठी माणसे आपल्याला वेडा म्हणतात ते पाहून मुलेही म्हणतात. तो हसून आपली पिशवी झाडाच्या फांदीला लटकावे, आणि खिशातला चेंडू घेऊन मुलांच्यात सामील होई. मुलांत तो रमे. त्यांच्याबरोबर दिवसभर खेळत राहण्यालाही त्याची हरकत नसे. लोक नेहमीच त्याला वेडा म्हणत नसत, कधीकधी कौतुकाने त्याला ‘चेंडू खेळणारा भिक्षू’ असेही म्हणत. त्याची कशालाच ना नसे. ही मुले त्याच्या कवितेत वारंवार येतात. एका कवितेत त्याने लिहिले, मंदिराशेजारी मुले मला पाहतात आणि माझ्याभोवती जमा होतात माझे हात ओढतात. मी माझा कटोरा एका दगडावर ठेवतो पिशवी झाडाच्या फांदीला लटकवतो प्रथम आम्ही गवताचा गोफ तयार करून रस्सीखेच खेळतो मग आम्ही चेंडू हवेत उडवतो आणि गाणे म्हणतो मी चेंडू उडवतो, ते गाणी म्हणतात ते चेंडू उडवतात, मी गाणी म्हणतो घटिका उडून जातात, वेळ विसरला जातो येणारी जाणारी माणसे मला पाहून हसतात, म्हणतात- “असे मूर्खासारखे तू काय करतो आहेस?” मी फक्त डोके हलवतो. काहीच उत्तर देत नाही मी उत्तर देऊ शकलो असतो, पण का देऊ? तुम्हाला माहीत आहे का, माझ्या मनात सुरुवातीपासून काय आहे? हेच. फक्त हेच.’ मुलांसारखे निरागस होणे... कवीच्या संदर्भात एक कथा अशी आहे-
एके दिवशी कवी घरी नसताना एक चोर त्याच्या झोपडीत शिरला. चोराला अर्थातच काही मिळाले नाही. तेवढ्यात कवी बाहेरून परत आला. चोर त्याला पाहून घाबरून पळू लागला. मात्र तो रिक्त हस्ताने परत चालला याचे कवीला वाईट वाटले. त्याने चोराला थांबविले. मात्र त्याला देण्यासारखेही कवीजवळ काही नव्हते. मग त्याने आपल्या अंगातील एकुलता एक अंगरखा त्याला काढून दिला. चोराला हे काय होते होते आहे हे समजेना. आपल्याला शिक्षा झाली नाही एवढ्यावर तो समाधानी होता, वर त्याला भेटही मिळाली. चोर निघून गेल्यावर कवीने मग या संदर्भात एक कविता लिहिली. पोषाखाच्या बदल्यात कविता हा सौदा काही कवीला महागात पडला नाही. ‘चोराने तसाच ठेऊन दिला चंद्र माझ्या खिडकीतला’ चंद्र ही झेन तत्वज्ञानात ‘साक्षात्काराची’ प्रतिमा म्हणून देखील वापरली जाते. जे आत्मज्ञान झालेले आहे त्याला बाहेरचा कुणी चोर कसा चोरून नेऊ शकणार? एका वेगळ्या पातळीवर हा हायकू वस्तूचे मोल प्रत्येक व्यक्तीनुसार कसे बदलत जाते हेही सूचित करतो. चंद्राचे भले कवीला मोल असेल पण चोराला काय त्याचे? प्रत्येकाचा चंद्र निराळा. एकाचा चंद्र दुसर्याच्या कामाचा नसतोच! हे जसे खरे तसेच हेही खरे की चंद्राचा अनुभवदेखील प्रत्येकासाठी वेगळाच असतो. योसा बुसोन या कवीने लिहिले आहे, ‘चंद्र असा की चोरानेही थांबावे आणि गाणे गावे’ -ही चंद्राची स्तुति आहे की चोराविषयीची कवीकल्पना?’ चंद्राचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो तसा प्रत्येकाला आलेला चोराचा अनुभव देखील वेगळा असतो. माझे मित्र कवि अलोन यांना चोराचा आलेला अनुभव वेगळाच होता. बाहेरच्या व्यवहारी जगात ते माधव सावरगावकर या नावाने ओळखले जात. ही सुमारे 1990 सालची गोष्ट आहे. त्यावेळी कविराज नांदेड बाहेरील एक लहानशा कॉलनीमध्ये राहत असत. कॉलनीत बहुधा पंधरा वीसच घरे असावीत. एका रात्री चोरांची एक टोळी त्या कॉलनीत शिरली. त्यांनी घरांना बाहेरून कड्या घातल्या व एकेका घरात शिरून लुटालूट करण्यास सुरुवात केली. त्या काळात कुणाजवळ मोबाइल तर सोडाच, साधे फोनही नव्हते. बाहेरची कुणाची मदत येणे सुतराम शक्य नव्हते. चोरट्यांनी अनेक घरे लुटली त्यापैकी एक कविराजांचे देखील होते. दुसर्या दिवशी ही बातमी समजल्यावर मी त्यांच्याकडे गेलो. कविराज शांतपणे पलंगावर बसले होते. पत्नी व मुलगी यांच्या चेहर्यावरचे भय अजून कमी झाले नव्हते. मी विचारले, “काही मोलाचे गेले नाही ना माधवराव?” “नाही. माझ्याजवळ त्यांना काय मिळणार? उलट रागारागाने दोन रट्टे मलाच देऊन गेले.” मग समोरच्या भिंतीतील पुस्तकांच्या कपाटाकडे हात करीत कवि शांतपणे म्हणाले, “हे धन तर माझ्याजवळच राहिले ना!” [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जगभर जपानी कवितेचे अनुवाद होणे जेव्हा सुरू झाले तेव्हा बाशोच्या बेडूकहायकूचे सर्वाधिक अनुवाद झाले. भारतात हायकू आणण्याचे श्रेय रविंद्रनाथ ठाकूरांना दिले जाते. 1919 साली रविंद्रनाथ जपानला सदिच्छा भेट देऊन परत आले. तेथे असताना त्यांना या कविताप्रकाराची ओळख झाली असावी. स्वत: एक भावोत्कट कवि आणि विचारांना निसर्गप्रेम व अध्यात्माची बैठक असणारे ठाकुर या कलाप्रकाराच्या प्रेमात पडले नसते तर नवलच. आल्यानंतर त्यांनी श्रेष्ठ जपानी हायकूकार बाशो याच्या काही कवितांचा बंगालीत अनुवाद केला. त्यापैकी एक बाशोच्या सुप्रसिद्ध ‘बेडूक हायकू’ चे भाषांतर होते. पुरोनो पुकुर ब्यांगेर लाफ जलेर शब्द या हायकूचा कविवर्य बा.भ. बोरकर यांनीही अनुवाद केला आहे पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज सुरेश मथुरे यांनी ‘हायकू : एक अवलोकन’ या पुस्तकात या संदर्भात एक मजेशीर माहिती दिली आहे. ते लिहितात, ‘बा. भ. बोरकर यांनी या हायकूविषयी लिहिले आहे, “मला तर या हायकूत कोठेच काव्य सापडेना.” हायकूचा प्रत्येकाने लावलेला अर्थ वेगळा असू शकतो! [कधीकधी न लावलेला अर्थही.] शिरीष पै या हायकूचा अनुवाद असा करतात एक तळे जुनाट स्तब्ध एक बेडूक बुडी घेतो त्यात जराशी खळखळ आणि पुन्हा शांत ‘एक’, ‘त्यात’, ‘आणि’ हे शब्द हायकूच्या अल्पाक्षरत्वला बाधा आणतात. ते गाळले तर हा अधिक बांधेसूद झाला असता. सुरेश मथुरे या हायकूचा अनुवाद असा करतात- जुनाटलेला डोह अडमड्या बेडकामुळे डुबुकली शांतता ‘डूबुकली’ हा सुरेख शब्द. मात्र बेडकाला कसले विशेषण बाशोने दिलेले नाही. अनुवादकानेही ते द्यायला नको. शांता शेळके यांनी या हायकुचा अनुवाद असा केला आहे- एक डबके जुनाट, संथ बेडूक मारतो उडी पाणी खळबळून पुन्हा निवांत एकटक पाहण्याची स्पर्धा माझ्यात आणि एका बेडकात - इस्सा हा इस्साचा हायकू वाचल्यावर तर मी बेडकाकडे अधिक ‘लक्ष ‘देऊ लागलो. एकदा पुन्हा अमेरिकेला गेल्यानंतरची गोष्ट. आम्ही एक छोटी ट्रीप काढली होती. एके गावी-आता त्याचे नाव आठवत नाही-मला बेडकाचे एक मजेदार शिल्प आढळले. तो हात पुढे करून काही तरी विचारीत होता? काय विचारीत होता? त्याची भाषा मला समजत नव्हती. मी काही बोललो तर त्याला ते समजणार नव्हते. मग मी त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिले. आणि त्याचा निरोप घेतला. बेडकाच्या निर्मात्याने जगाचा घेतलेला निरोप. बाशो त्याच्या जीवनातच अत्यंत लोकप्रिय कवी बनला खरा पण काव्याला मिळणारी लोकप्रियता ही भ्रामक आणि कवितेला घातक देखील आहे असे बाशोचे मत होऊ लागले. हायकू हा जणू काही खेळ बनला होता. तसेच पैशासाठी ‘हायकू- मार्गदर्शन’ करणारी मंडळी देखील वाढली होती. एके वर्षी बाशो चेरीचा बहर पाहाण्यासाठी निवडक ठिकाणी गेलाच नाही. त्याने लिहिले, ‘नुसता आरडा ओरडा करणेच ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या गोंगाटाने ती ठिकाणे गजबजली आहेत.’ बाशो कवितेला अतीशय गंभीरपणे घेणारा कवी होता. हायकूमध्ये झेन तत्वज्ञानाचे प्रतिबिंब त्याने पाहिले. साधेपणा, थेटपणा, नैसर्गिकपणा व अगाधता ही झेन तत्वे हायकूत असायला हवी असे त्याचे प्रतिपादन होते. प्रत्येक हायकू पुढीलपैकी एका भावनेच्या पायावर आधारलेला असला पाहिजे- ‘एकाकीपणातिल सौंदर्य, मानवी जीवनाची अपूर्णता, ‘आत्यंतिक साधेपणा , क्षणभंगुरतेची जाण व नश्वरता हे जीवनाचे मूलभूत सत्य आहे ही जाणीव, जीवनातील लाभाविषयी उदासीनता, व उत्कट भावनिक प्रतिसाद. हायकूबद्दल तो शिष्यांना सांगे, ‘कविता वाचताना असे वाटले पाहिजे की जणू आपण फार खोल नसलेल्या नदीतील तळाचे दगड पाहतो आहो.’ 1693 साली बाशोने आपल्याकडे ठेऊन घेतलेला त्याचा पुतण्या वारला. त्याच्या मृत्युचा बाशोवर फार परिणाम झाला. तो स्वत:त अधिक अधिक गुंतत गेला. ऑगस्ट महिन्यात तर त्याने घराची दारे बंद करून घेतली व मित्रांनाही आत येण्यास मनाई केली. तो पुन्हा समाजात वावरू लागला खरा पण मनाने तो दूर निघून गेला होता. ऑक्टोबर 1694 मध्ये तो खूप आजारी पडला. आपला अंत जवळ आला आहे हे त्याने ओळखले. या काळातच त्याने त्याचा ‘निरोपाचा हायकू’ लिहिला. प्रवासात आजारी पडलोय- स्वप्ने भिरभिरताहेत वाळलेल्या कुरणावर यानंतर बाशोने जेवणखाण बंद केले. 26 नोहेंबर रोजी सकाळी तो उठला, स्नान केले व बुद्धाच्या मूर्तीसमोर त्याने उदबत्त्या लावल्या. दुसर्या दिवशी भेटायला आलेल्या शिष्यांना त्याने प्रत्येकी एक हायकू लिहावयास सांगितले.त्यानंतर तो म्हणाला, “या क्षणापासून तुमचा गुरू तुम्हाला दुरावला आहे. मला काहीही विचारू नका. मी काहीही सांगणार नाही.” नंतरच्या दिवशी पुन्हा शिष्य त्याला भेटायला आले. त्या दिवशी खोलीत माशा फार घोंघावत होत्या. त्यांच्याकडे पाहून बाशो हसून म्हणाला, “एक माणूस आजारी पडला आहे हे पाहून त्यांना आनंद झालेला दिसतो.”
मग त्याने डोळे मिटून घेतले व शांतपणे या जगाचा निरोप घेतला. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] गेले तीन चार ब्लॉग आपण तत्वचर्चेत बुडालो असल्यामुळे आपल्या बेडकाला विसरलो होतो. पुन्हा एकदा त्याची भेट घेऊ. बाशोचा हायकू, मला वाटते आतापर्यंत सर्वांना पाठ झाला असेल. प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक एक काळ असा होता की हायकूला ‘झेन तत्वज्ञानाचे काव्यात्म रूप’ असे समजले जात होते. आज ती कल्पना कालबाह्य झाली आहे. अनेक तरुण जपानी कवींना, आणि बहुतेक परकीय हायकूकारांना झेन तत्वज्ञानाची नीट ओळख नाही. हायकू लिहिण्यासाठी वा अनुवादित करण्यासाठी त्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. असे असले तरी बाशो हा झेन सांप्रदायाचा अभ्यासक होता व त्याच्यावर असलेला ‘झेन’ प्रभाव या हायकूत देखील स्पष्ट दिसतो. हा हायकू म्हणजे 17 ओन मध्ये सांगितलेली काव्यात्म ‘झेन कथा’च आहे. प्राचीन तलाव या हायकूचे मध्यवर्ती केंद्र आहे. तो किती प्राचीन आहे हे सांगता येत नाही. अर्थात त्याची गरजही नाही. तो ‘प्राचीन’ आहे एवढे पुरेसे आहे. मग आपल्याला दिसते की एक बेडूक त्या तलावात उडी मारतो आहे, आणि त्या उडीतून एक आवाज निर्माण होत आहे. फक्त आवाज नव्हे, कवीच्या मनात आणखी काहीतरी निर्माण झाले आहे. ती आहे ‘जाण’. तो आहे आत्मसाक्षात्कार. Enlightenment. असे म्हटले जाते की बुद्धाला पहाटेच्या तार्याकडे पाहून ‘साक्षात्कार’ झाला. या क्षणाला जपानी भाषेत ‘सटोरी’ असे नाव आहे. एखाद्या बाह्य घटनेमुळे अचानक सार्या चित्तवृत्ती स्थिर होतात, मन स्वच्छ होते. निर्मळ होते. आणि माणूस विश्वाशी एकरूप होतो. हा साक्षात्कारी क्षण समजावून सांगता येत नाही, ज्याला तो साक्षात्कार झाला त्याला देखील आपल्या आत नेमके काय घडले हे समजत नाही, मग इतरांना ते सांगणे दूरच. ‘ज्ञान जे समजावून सांगता येते ते विश्वात्मक ज्ञान नसतेच’ अशी ताओ तत्वज्ञानात एक संकल्पना आहे. बुद्धासाठी तार्याचे दिसणे हा साक्षात्कारी क्षण होता, बाशोसाठी, ‘बेडकाने उडी मारणे’ हा. या हायकूतील अव्यक्त भाव ‘मी एकाकी आहे’ हा आहे. एका समीक्षकाने लिहिले, ‘ही कविता हा एक प्रवास आहे-शांततेकडून ध्वनीकडे व ध्वनिकडून परत शांततेकडे.’ आणखी एका रसिकाच्या मते, ‘येथे मांडला गेला आहे तो फक्त एक क्षण. या कवितेत स्थल आणि काळाचा विस्तार नाही. कोणतीच कविता याहून साधी असू शकत नाही. ती अनन्यसाधारण आहे.’ प्रत्येक क्षण हा एक नवा ‘अर्थ’ मनात निर्माण करू शकतो. तेवढ्या उत्कटतेने तो जगला मात्र पाहिजे. त्या दिवशी बेडकाने हायकूत मारलेली उडी एका अर्थाने युगप्रवर्तक ठरली. कारण त्यानंतर प्राण्यांकडे पाहण्याच्या जपानी कवींच्या दृष्टीतच फरक घडून आला. पण हा फरक झाला होता तो कुणा एकाच्या कवितेमुळे. तो आतून आलेला नव्हता. त्यामुळे इतरांनी त्यानंतर लिहिलेले ‘बेडकावरील हायकू’ बहुतेक वेळा पृष्ठस्तरावरच राहिले. त्यांची उडी खोल गेलीच नाही. बाशोच्या या सुप्रसिद्ध ‘बेडूक-तलाव’ हायकूबद्दल नंतरच्या हायकूकवींनीही अनेक टिपणे लिहिली आहेत. शिकी, ज्याला आधुनिक हायकूचा निर्माता’ असे मानले जाते, त्याने या संदर्भात एक सुरेख टिपण लिहिले आहे. तो कल्पनेत बाशोला त्याच्या झोपडीत एकटा बसलेला पाहतो. [इतर टीकाकार जसे मानतात तसे ‘मित्रांच्या, शिष्यांच्या घोळक्यात’ नव्हे. ] शिकी लिहितो, ‘बाशोच्या मनात हायकूच्या परंपरागत रचनेबद्दल असमाधान होतेच. काहीतरी एक वेगळा मार्ग शोधायला हवा असा तो विचार करीत होता. जणू एखाद्या धुक्यात बसावे तसा तो बसून होता. Trance’ मध्ये असल्यासारखा. अर्धजागृत, अर्धनिद्रिस्त. भोवती सर्वत्र शांतता होती. अशावेळी त्याला ‘तो’ आवाज ऐकू आला. बेडकाने तळ्यात उडी मारल्याचा आवाज. त्याच्या कानात कोठूनसे शब्द उमटले, ‘बेडूक उडी मारतो...पाण्याचा आवाज.’ बाशो स्वप्नातून जागा झाला त्याच्या चेहर्यावर स्मित फुलले होते.’ अनेक कवींनी बाशोच्या बेडकाच्या पाठीवर बसून तलावात उडी मारलेली आहे. 19व्या शतकातील प्रसिद्ध जपानी कवी र्योकान याने या हायकूच्या संदर्भात एक हायकू लिहिला आहे- नवीन तलाव बेडूक उडी मारतो आवाज नाही. आपण ‘नवीन तलावात उडी मारणारे बेडूक’ आहो आणि आपल्या ‘हायकूत उडी’ मारण्यामुळे कसलाही आवाज होणार नाही असे तर कवीला सुचवायचे नसेल? एखादी कविता लोकप्रिय झाली की तिची विडंबनेही होऊ लागतात. एका कवीने लिहिले - तळ्याकाठी चिंतन करतोय बाशोचा बेडूक माशी केव्हाच उडालीय बाशोच्या या हाइकूची लोकप्रियता इतकी वाढली की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना त्याचा मोह पडलेला आहे. सेनगई नावाच्या एका चित्रकार भिख्खूने 18 व्या शतकात काढलेले एक चित्र उपलब्ध आहे. या चित्रात एका केळीच्या झाडाखाली एक बेडूक बसलेला दिसतो. [जपानी भाषेत ‘बाशो’ म्हणजे फळ न येणारे केळीचे झाड हा संदर्भ ध्यानात घ्यायला हवा]. या चित्राच्या वरच्या बाजूस एक हायकू लिहिला आहे- इथे तलाव असता तर मी उडी मारून बाशोला आवाज ऐकवला असता आधुनिक काळात देखील या हायकूची लोकप्रियता कमी झालेली नाही. Marlin Mountain [1939-1987] या अमेरिकन कवयित्रीचा एक हायकू प्रसिद्ध आहे. तिने तो जपानी पद्धतीने एका ओळीत लिहिला आहे. Old pond frog rises belly up प्राचीन तलाव बेडूक तरंगतोय पोट वर अगदी अलीकडे, म्हणजे 1987 साली जपान एयरलाईन्सने या हायकूचा संदर्भ घेत स्वतंत्र हायकू लिहिण्याची स्पर्धा घेतली होती. तिच्यासाठी हजारो स्पर्धकांनी आपले हायकू पाठविले होते. या स्पर्धेत Bernard Einbound च्या ज्या हायकूला पहिले बक्षीस मिळाले तो असा होता- बेडूक-तलाव एक पान पडले आवाजाविना -प्रत्येकाच्या तळ्यात काही पडले तर आवाज येईलच असे नाही. बाशोच्या बेडकाने तलावात मारलेली उडी किती खोल गेली आहे याचा अभ्यासक सतत शोध लावतच असतात. उडीमुळे निर्माण झालेल्या आवाजाचे प्रतिध्वनी अजून जगभर घुमतच आहेत! येथपर्यंत मी लिहिले होते व लेख पूर्ण केला होता. माझ्या नव्या पुस्तकात हा लेख अंतर्भाव करण्यासाठी पुन्हा वाचला तेव्हा माझ्या मनात आले, या हायकुला आधुनिक संदर्भही आहे. बाशोच्या काळात सर्वत्र तलाव होते आज त्यापैकि बहुसंख्य आटले आहेत. जग हळूहळू कोरडे होत चालले आहे. उडी मारण्यास पाणी नसेल तर बेडूक काय करील? माणूस काय करील? चिंतेशिवाय दुसरे काय? मग मला जाणवले की मीच बेडूक आहे. मीच बाशो [कवि]. माझ्यातील बेडकाने पाणी नसलेल्या जमिनीवर उडी मारली तरी ‘आवाज’ कसा येणार? मनात स्निग्धता नसेल तर नवनिर्मिती कशी होणार? थोडा विचार केल्यावर ध्यानात आले की हे सार्या कलांसाठी लागू होणारे सत्य आहे. कलेला रसाची आवश्यकता असते आणि आटला तर सृजनशीलता करपून जाते. आणि मी लिहिले - बाशो आहे मी आहे
तलाव मात्र नाही चिंता करतोय बेडूक [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकूच्या अनुवादासंदर्भात अनेकांनी माझ्याकडे काही प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी ही खास पोस्ट अनुवादसंदर्भात. ‘घंटेवरले फुलपाखरू’ या तीन श्रेष्ठ जपानी कवींच्या हायकूंच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी केलेले भाषण, थोडक्यात. ‘जपानचे तीन महाकवी आणि त्यांचे कार्य यांचा परिचय करून देत त्यांच्या सुमारे पाचशे हायकुंचा भावानुवाद सादर करणारे हे पुस्तक आहे. शाळेत असतानाचे ते दिवस मला आठवतात. त्या दिवसांतच कवितांची गोडी मनाला लागली होती. प्रथम वाचलेले कवितांचे पुस्तक होते ‘विशाखा’. मग बालकवी, गोविंदाग्रज, केशवसुत, तांबे वाचले. कवितांची भूल मनावर पडायला सुरुवात झाली होती. मग कॉलेजमध्ये गेल्यावर बोरकर, मर्ढेकर, ग्रेस वाचले. भूल वाढतच गेली. गंमत म्हणजे इतर भाषांतील लेखक वाचायला सुरुवात केल्यावर देखील प्रथम कवीच वाचले. टागोर आणि खलील जिब्रान. गालिब आणि साहीर. नंतर पास्तरनाक, रिल्के आणि फ्रॉस्ट. नक्ष लायलपुरीचा एक शेर आहे- ‘कहां तक नाम गिनवाये, सभीने हमको लूटा है’! सांगायचं म्हणजे कवितेशी नाते इतके जुने आहे. या कवितांच्या वाचनाने मनाची कवितेला प्रतिसाद देण्याची एक बैठक तयार झाली. कधी वाटायचे की आपणही कविता लिहाव्यात. ही गोष्ट आज माझ्या फक्त एकाच मित्राला ठाऊक आहे की माझ्या दोन कविता १९७०-७१ साली ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मला अजून आठवते की लिहिताना त्या भलत्या ग्रेट आहेत असे वाटले होते, आणि हेही स्पष्ट आठवते की छापून आल्यावर प्रथम जाणवले होते ते त्यांचे सामान्यपण. मी ज्या कविता वाचत होतो, अनुभवत होतो त्या तुलनेत माझ्या कविता कुठेच नव्हत्या. जी.ए.नी एका पत्रात लिहिलेले मी खूप नंतर वाचले, “कवी म्हणून माझी निवड झालेली नव्हती.” मला जाणवले की कवींच्या भूमीत घुसखोरी करता येत नाही. तिच्यात राहण्याचा परवाना तुम्हाला ‘वरून’ मिळावा लागतो. पण तिथले नागरिकत्त्व मिळाले नाही तरी तेथे जाऊन येण्याचा प्रवासी व्हिसा जरूर मिळतो आणि तो मिळतो अनुवादातून. कविता लेखन थांबले, पण कवितांचे वाचन चालूच होते. एकदा गुलजार नांदेडला आले असता त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करून त्यांना ऐकविली. [त्यांना मराठी चांगले येते.] त्यांना ती आवडली. मग मी त्यांच्या ७५ कवितांचा अनुवाद केला, तो ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ या नावाने प्रकाशित झाला व त्याचे उत्तम स्वागत झाले. या कवितांपैकी काहींचा गुच्छ गुलजारांनी ‘त्रिवेणी’ या नावाने प्रकाशित केला होता. त्यावेळी प्रथम ‘अल्पाक्षरी कवितेची ओळख झाली’. अमेरिकेत मुलाकडे गेलो असता योगायोगाने जपानचा महाकवी इसाच्या ३६० हायकूंचा इंग्रजी अनुवाद हाती आला. तेथल्या वाचनालयात शोधल्यावर तेथे इतरही कवींच्या हायकुंचे अनुवाद मिळाले. त्या सहा महिन्यांत जवळजवळ तीन हजार हायकू मी वाचले. हायकू हे लघु कवितेचे एक रूप. मूळ देश जपान. तेथे सुमारे चारशे वर्षांपासून ‘हायकू परंपरा’ जपली जाते. तीन ओळींत एक संपूर्ण भावस्थिती वाचकासमोर उभी करणे हे हायकूचे प्रधान वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्त्वाचा आग्रह असल्यामुळे येथे विस्ताराला मज्जाव आहे. जे मांडावयाचे आहे ते अत्यंत कमी शब्दात, जवळजवळ सूत्ररूपाने मांडण्यावर हायकूकर्त्याचा भर असतो. उदाहरणादाखल बाशोचा एक हायकू आपण पाहू- पर्णहीन फांदीवर कावळा येऊन बसला शरदातील संध्याकाळ हे एक निसर्गचित्र आहे की संध्याकाळविषयी कवीला काही सांगावयाचे आहे? कवी फक्त ‘संध्याकाळ’ लिहितो. त्याचा अर्थ ‘संध्याकाळी’ असा घेतला तर हे मोजक्या रेषांनी रेखाटलेले एक निसर्गचित्र बनते. पण ‘संध्याकाळप्रमाणे’ असा घेतला तर कावळा आणि संध्याकाळ मधील सीमारेषाच संपून जाते.[येथे हेही ध्यानात घेतले पाहिजे की जपानी परंपरेत हायकुमध्ये ‘प्रमाणे, सारखा,’ असे शब्द वापरू नयेत असा संकेत आहे.] कावळा जसा फांदीवर बसला आहे तशी ही संध्याकाळ कवीच्या मनावर येऊन बसली आहे. आता ‘पर्णहीन’ हा शब्द कवीच्या मनाची स्थिती दर्शविणारा बनतो आणि कवितेची दिशा बदलून जाते. फांदीवरल्या कावळ्याचे वजन आता आपल्याला जाणवू लागलेले असते. बुसोनचा असाच एक हायकू आहे- वसंत जातो आहे कोठे ते माहित नाही- बोट नांगरलेली ‘नांगरलेली’ बोट हे कवीच्या आयुष्याचे प्रतीक म्हणून पहिले तर ती, एका ठिकाणी असून सुद्धा आपल्याला किती दूर घेऊन जाते! हायकू हा माणसाची निसर्गाशी आणि स्वत:शी होणाऱ्या भेटीचा क्षण अलगद टिपतो. हायकू हे ‘पाहणे’ आणि ‘अनुभवणे’ यांचे संयुग असते. हायकूत कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो. अनुभव त्याच्या अस्तित्त्वात असा काही विरघळून जातो की त्याचे वेगळेपण उरत नाही हायकूंचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे तर अतिशय कठीण बनते. योग्य प्रतिशब्द तर मिळवावेच लागतात, पण मर्यादित संख्येत. सांस्कृतिक भिन्नता असल्यामुळे आपल्या विश्वातील योग्य संदर्भ शोधावे लागतात. मला जपानी येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जपानी ते इंग्रजी ते मराठी अशी अधिक अवघड बनून जाते. आणखी एक अडचण मला जाणवली. इंग्रजीत जपानी हायकूंचे अनेक अनुवाद झालेले आहेत. इस्साच्या हायकूंचे अनेक वेगवेगळे अनुवाद मला सापडले. आणि ते सारे एकमेकापासून भिन्न होते. बाशोच्या, या ब्लॉगच्या सुरूवातीला सांगितलेल्या, ‘बेडूक हायकूचे’ तर 100 हून अधिक अनुवाद माझ्याजवळ आहेत. मग कोणता ग्राह्य धरायचा? बुसोन या कवीचा एक जगप्रसिद्ध हायकू आहे. त्याचा माझ्या वाचनात आलेला पहिला अनुवाद- Butterfly Sleeping On the temple bell मी त्याचा अनुवाद असा केला होता- देवळातल्या घंटेवर- झोपले आहे फुलपाखरू त्याचे इतर काही अनुवाद असे होते.
हा इंग्रजी अनुवाद मी प्रथम वाचला असता तर माझा मराठी अनुवाद असा झाला असता- देवळातल्या घंटेवर कुणीतरी शांत झोपले आहे पहा-एक फुलपाखरू प्रश्न असा पडतो मराठी अनुवादसाठी कोणता इंग्रजी अनुवाद ग्राह्य धरायचा? शेवटी मनाचा कौल मानावा लागतो. प्रत्येक भाषेची लय अनन्यसाधारण असते. ती दुसर्या भाषेतील शब्दांतून पकडणे अवघडच. म्हणून काव्याची भाषांतरे सहसा असमाधानकारक वाटतात. जपानमध्ये हायकू संदर्भात काही संकेत पाळले जातात व त्यांचे मूळ परंपरेत असते. ही जपानी परंपरा माहीत नसेल तर तो हायकू नीट समजत नाही व त्याचा अनुवादही ‘नेमका’ होत नाही. हायकूमध्ये नुसता ‘बहर’ असा शब्द असेल तर त्याचा अर्थ ‘चेरीचा बहर’ असा घेतला जातो. हायकूचा अनुवाद जर एवढा अवघड असेल तर मग तो का करावा? या प्रश्नाचे माझे उत्तर असे की हायकू वाचताना मला जो आनंद मिळाला तो मनातल्या मनात त्यावर चिंतन करताना द्विगुणीत झाल्यासारखा भासत होता. कधीकधी कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता काही प्रतिशब्द मनात तयार होत आणि कागदावर प्रकट होण्याची मागणी करीत. दुसरे असे की जे आपल्यापर्यंत आले ते इतरांपर्यंत पोचविण्याची एक अनिवार उर्मी माझ्यात आहे. म्हणून मी हे अनुवाद केले. इस्साचा एक हायकू आहे- वसंतातील संध्याकाळ मी एका मेणबत्तीने दुसरी पेटवीत जातो हे अनुवाद म्हणजे एक प्रकारे ‘दुसरी मेणबत्ती’ पेटविण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेतून येताना तेथे वाचलेल्या सुमारे ३००० हायकू पैकी ५०० हायकूंची निवड केली व ते घेऊन परत आलो. नंतर मी रोज फक्त एका हायकूचा अनुवाद करण्याचे ठरविले. सकाळी एक हायकू वाचायचा, दिवसभर तो मनात घोळवायचा आणि रात्री त्याचा अनुवाद करून एका फाईल मध्ये सरकवून द्यायचा. एक महिन्यानंतर लिहिलेल्या तीस हायकुंचे पुन्हा वाचन करायचे, त्यांत सुधारणा करायच्या आणि पुढे सरायचे. अशा प्रकारे अनुवादित केलेले सुमारे पाचशे हायकू या संग्रहात मी समाविष्ट केले आहेत. फक्त एक ‘वैधानिक इशारा’ देऊन ठेवतो. हायकूच्या आकलनासाठी आणि आस्वादासाठी वाचकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. हायकू वाचल्यानंतर, ‘हे काहीतरी अवघड दिसते आहे’, किंवा ‘हे काही समजले नाही’ अशी त्वरित कमेंट करून पुढे सरकत गेले तर हायकूच्या विश्वात तुम्हाला कधीच प्रवेश मिळणार नाही. असे करणे म्हणजे काठावर बसून समुद्राची कल्पना करणे होय. कुठल्याही कलाकृतीच्या आस्वादासाठी मनाची स्वागतशील अवस्था अत्यावश्यक असते. हायकूच्या संदर्भात तर जास्तच. हायकू हे निवांतपणे, ‘चित्ती हळुवारपणा’ आणून, एकट्यानेच वाचायचे असतात. सहज जाताजाता चार हायकू वाचू असे म्हणून हायकू वाचता येत नाहीत. शेवटी या अनुवादासंदर्भात मी लिहिलेला एक हायकू: तळ्यातल्या सावल्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या तसे हे हायक धन्यवाद.
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] मागच्या ब्लॉग मध्ये आपण हायकूची बलस्थाने बघितली. हायकू रसिकाने ही बलस्थाने ध्यानात घेऊन त्याच्याकडे वळले पाहिजे. Gabriel Rosenstock या अभ्यासकाने ‘Haiku Enlightenment’ नावाचे एक उत्तम पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने हायकू रसिकाची तुलना मधमाशीशी केली आहे. बाशोचा एक हायकू उदघृत करून तो लिहितो- ही मधमाशी फुलातून बाहेर येण्यासाठी किती अनुत्सुक रसिकानेही हायकूतून ‘बाहेर’ येण्यास असेच अनुत्सुक राहिले पाहिजे. बाहेर येण्याची घाई तर मुळीच करू नये. हायकू वाचणे ही आपल्यासमोर आलेल्या एका विश्वाचे उत्खनन करण्याची संधी मानली पाहिजे. त्या विश्वात आपल्याला अनेक विश्वे मिळू शकतात. Diana Franinचा एक हायकू आहे- ब्रेडचा तुकडा उड्या मारतो आहे चिमणीबरोबर अंगणात रसिकही हायकूसोबत रांगू शकतो, उड्या मारू शकतो, हवेत उडू शकतो, पडू शकतो आणि स्तब्धही राहू शकतो. हायकूचा आस्वाद ही एक स्वतंत्र कला आहे. हा आस्वाद शक्यतो निर्दोष व्हावा यासाठी हायकूची निर्मिती प्रक्रिया ठाऊक असणे गरजेचे आहे, जी आपण गेल्या ब्लॉगमध्ये पहिली आहेच. हायकू हा माणसाची निसर्गाशी व स्वत:शी होणार्या भेटीचा क्षण अलगद टिपतो. हायकूत जे दडलेले असते ते शोधण्यासाठी वाचकाने स्वत:ल 3 प्रश्न विचारावे 1] कवि काय वर्णन करतो आहे? हायकूत जे पंचेंद्रियांतर्फे माणसाला जाणवते त्याचे प्रतिमाद्वारे वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ दृष्टीने जाणवणारे [गळून पडणारी फुले, सळसळणारी पाने, सूर्योदय वगैरे.] ध्वनि [धबधब्याचा आवाज, तळ्यात उडी मारणार्या बेडकाचा आवाज, कीटकांची गुणगुण.] गंध [प्लमच्या फुलांचा मंद सुगंध, किंवा रान शेवंतीचा उग्र वास.] चव [ताज्या फळांची चव, किंवा मद्याची.] 2] ही घटना केव्हा घडते आहे हे पाहणेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ : वसंत ऋतूत की शरद ऋतूत? 3]कवि कोठे या घटनेचा अनुभव घेतो आहे तेही पाहिले पाहिजे. उदा. पर्वतमाथा, दर्या, रस्ता किंवा पायवाट,समुद्रकिनारा वगैरे. अर्थात हायकू कवि हे सारे स्पष्टपणे मांडत नाही. ते प्रतिकांतून मांडले जाते. ती प्रतीके शोधणे म्हणजेच हायकूचा अर्थ शोधण्याच्या प्रवासाला प्रारंभ करणे होय. केव्हाकेव्हा कवीची प्रतीके शोधता शोधता रसिकाच्या मनात ‘त्याची’ स्वतंत्र प्रतीके तयार होऊ शकतात. हायकूत रसिकाचा सहभाग असतो हे मी अनेक पुस्तकात वाचले होते. ते एकदा मला प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाले. मी जेथे राहतो त्या नांदेड सिटीत अनेक संकुले आहेत आणि प्रत्येक संकुलासाठी एक लहानशी स्वतंत्र बाग आहे. एके दिवशी बागेतून घरी जाताना कॉलनीतील एका परिचिताकडे गेलो. तो बरेच दिवसापासून बोलावत होता. घरी गेल्यावर त्याने मला त्याच्या गॅलरीत लावलेली बाग दाखवली. अनेक प्रकारच्या फुलांची झाडे त्याने कुंड्यात लावली होती. एका कुंडीकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘हा पहा, किती सुरेख बोनसाय मी तयार केला आहे! बागेत हे झाड सुमारे तीन फूट उंच वाढते. या कुंडीत हे फक्त सहा इंच उंचीचेच वाढले आहे. एवढेसेच झाड पण त्याला फूलही आलेले आहे.” तो कौतुकाने बोनसाय बनविण्याची पद्धत मला सांगत होता. पण मला तो प्रकारच पटलेला नव्हता. तो झाडांवर अत्याचार आहे असे माझे मत होते. पण ते त्याच्या तोंडावर सांगण्याचा संकोचही वाटत होता. घरी आलो. मनात ते कृत्रिमपणे ‘तयार’ केलेले झाड सारखे येत होते. मन उद्विग्न झालेले होते. त्या दिवशी रात्री नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे डायरीत तो प्रसंग लिहिला. काहीतरी मन दुखावणारे मनात फिरत होते पण काय ते समजत नव्हते. [नेमकी ती ‘ठसठसणारी नस’ सापडत नव्हती.] खूप वेळानंतर फक्त दोन ओळी सुचल्या. त्या लिहून ठेवल्या- वितभर झाड नखाएवढे फूल ... तिसरी ओळ सुचलीच नाही. आणखी दोन दिवस असेच गेले. नंतरच्या दिवशी सकाळी, डॉ. मुलमुलेना सहजच फोन लावला. डॉक्टरांची व माझी मैत्री मी नांदेडला असल्यापासूनची. बागेत आलो आणि थोडा निवांत असलो की मी त्यांना फोन लावतो. त्यांना ताजा ताजा हायकू खाऊ घालतो. त्यांना मी मनात उमटलेल्या दोन ओळी सांगितल्या. म्हणालो, “एका हायकूच्या दोन ओळी सुचल्या आहेत. ‘वितभर झाड/नखाएवढे फूल’- तीन दिवसापासून मला तिसरी ओळ सापडत नाहीय.” ते म्हणाले, “दोन ओळी तर छान आहेत. तिसरीही लौकरच सुचेल.” दुसर्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला. “तिसरी ओळ व्हाट्सअप वर पाठविली आहे.” मी त्यांचा मेसेज पाहिला. तो असा होता- वितभर झाड नखाएवढे फूल दरवळ घरभर पहिल्या दोन ओळी कोणत्या प्रसंगामुळे सुचल्या हे मी त्यांना सांगितले नव्हते. त्यामुळे ते आपल्या स्वतंत्र वाटेने त्या ओळींना घेऊन गेले, आणि त्यांनी माझा हायकू पूर्ण केला.
मला श्रेष्ठ जपानी हायकुकार ओगीवारा याची आठवण झाली. त्याने लिहिले आहे, ‘कवि फक्त अर्धाच हायकू लिहितो, उरलेला अर्धा हायकू वाचकाने पूर्ण करायला हवा.’ मी डॉक्टरांना म्हणालो, ‘हायकू तर छान जमला आहे. तुम्ही या दिशेने कसे गेलात?” “या दिशेने म्हणजे?” मग मी त्यांना माझ्या दोन ओळींची जन्मकथा सांगितली. ते म्हणाले, “मला अर्थातच हे माहीत नव्हते. मला वाटले तुमच्या घरच्या कुंडीत आलेल्या फुलाच्या संदर्भात त्या ओळी आहेत.”मुलमुलेंनी माझा हायकू पूर्ण केला होता, पण त्यांनी किती वेगळ्या दिशेने त्याला नेले होते! त्यांनी झाडाला आलेल्या नखाएवढ्या फुलावर लक्ष केन्द्रित केले होते. वितभर झाडावरच्या नखभर फुलाने त्यांच्या कल्पनेतील सारे घर सुगंधित करून टाकले होते. माझे मनही. हायकूचा याहून वेगळा कोणता परिणाम व्हायला हवा? [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे गेल्या ब्लॉगमध्ये आपण हायकूची व्याख्या व रूपाकार याबद्दल पहिले. या संदर्भात ‘हायकू ऋतु’ या समूहावरील अनेकांनी विचारणा केली की हायकुची नेमकी व्याख्या काय करता येईल. मी काही व्याकरणतज्ज्ञ नाही, पण सर्वसाधारणपणे मी हायकूची ही व्याख्या करू इच्छितो- “हायकू ही अल्पाक्षरी कविता अर्थपूर्ण शब्दांची पुनर्रचना करून एका क्षणाचे अनन्यसाधारणत्व प्रभावीपणे मांडते. हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. सूचकता हा हायकूचा प्राण आहे. हायकू कविता ‘एका क्षणाबद्दल’ काही सांगू पाहते. मात्र ती त्या क्षणाशी बद्ध नसावी. हायकू हा जवळ आणि दूर, समोर आणि पार्श्वभूमीला, भूतकाळ आणि वर्तमानकाळ, ध्वनि आणि शांतता, क्षणभंगुरत्व आणि दीर्घकालीन अस्तित्त्व अशी जीवनाची द्वैती रूपे दर्शविणारा असतो.” अर्थात कोणत्याही व्याख्येसंदर्भात मतभेद होतात तसे या व्याख्येसंबंधीही होऊ शकतात. माझेच बरोबर असा आग्रह हायकू कुणीही धरू नये. आपल्या समूहावरील चर्चेतून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे ‘हायकूत आताचा क्षण’ असलाच पाहिजे ही संकल्पना बरीच रूढ झालेली आहे. [मीही बराच काळ ती मान्य केली होती. पण हायकूविषयी आधुनिक अभ्यासकांची जी मते माझ्या वाचण्यात आली, आणि जे श्रेष्ठ हायकू मी वाचले त्यावरून माझे मत थोडे बदलले आहे. हायकू मराठी रसिकांना हायकूची ओळख करून देण्याचे श्रेय शिरीष पै यांचे. [पै यांच्या बद्दल एक स्वतंत्र लेख मी लिहिणार आहेच.] शिरीष पै यांचे समग्र हायकू पॉप्युलर प्रकाशनाने ‘हायकू हायकू हायकू’ या नावाने प्रकाशित केले आहेत. त्यांत शिरीष पै यांच्या एका प्रस्तावनेचा संक्षिप्त भागही दिला आहे. त्या प्रस्तावनेत शिरीष पै लिहितात – ‘1963 साली सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर ह्यांनी एके दिवशी माझ्या हातात हायकूंचा एक सुंदर संग्रह ठेवला व ते म्हणाले, “आधी नाही...नंतर नाही...फक्त आताचा क्षण... त्या क्षणाची कविता म्हणजे हायकू.”’ शिरीष पै यांनी मराठीत हायकू लोकप्रिय करण्यासाठी जे काही कार्य केले ते अतुलनीय आहे. त्यामुळे हायकूंच्या संदर्भात त्यांचा शब्द एकेकाळी अंतिम मानला जात होता. मात्र अनेकांनी ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजे हायकू’ याचा अर्थ ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असा लावला. त्याविषयी थोडे लिहिणे आवश्यक आहे. हायकूत ‘आताच्या क्षणाला महत्व असते’ हे मान्य मात्र ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असे म्हणता येणार नाही. आताचा क्षण वगळूनही उत्तम हायकू लिहिता येऊ शकतात, लिहिले जातात. उदाहरणार्थ जपानचा श्रेष्ठ कवि ईस्सा याचा एक गाजलेला हायकू असा आहे - दिवस किती मोठा आहे हे कारण पुरेसे म्हातारपणी डोळे पाणावयास किंवा बुसोन याचा एक हायकू असा आहे- चंद्र असा आहे की- चोरानेही थांबावे आणि गाणे गावे आता या हायकूंत ‘आताचा क्षण’ कोठे आहे? आताच्या क्षणासंबंधी हायकू अवश्य लिहावा [कारण आताच्या क्षणात आपण अधिक तीव्रतेने व उत्कटतेने सामील झालेलो असतो] पण याव्यतिरिक्तही हायकू लिहिता येतात हे ध्यानात ठेवावे.
जपानी संकल्पनेप्रमाणे श्रेष्ठ हायकूत खालीलपैकी एक किंवा दोन आशयसूत्रे असणे आवश्यक आहे. ‘जीवनातील अपूर्णता, एकाकीपणातील सौंदर्य, क्षणभंगुरतेची जाण आणि नश्वरता हे आयुष्याचे मूलभूत सत्य आहे ही जाणीव, जीवनातील लाभाविषयी उदासीनता व उत्कट भावनिक प्रतिसाद. जीवनाचा अर्थ शोधण्याची धडपड कवीच्या आत्म्यात असली पाहिजे.’ हायकूत निसर्ग असलाच पाहिजे अशी सक्ती करता येणार नाही; तरीही मला वाटते की हायकूमध्ये निसर्ग आला तर उत्तमच.. निसर्ग हा हायकूचा प्राण आहे. काही हायकू निसर्ग या विषयाव्यतिरिक्त लिहिण्यास हरकत नाही, तसे हायकू लिहिले जातातही. निसर्ग हा प्राण आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसा-माणसाच्या नात्यापेक्षाही माणसाचे निसर्गाशी असलेले नाते फार वेगळे आहे. ते सनातन तर आहेच; पण तेथे माणूस थोडा शरण्यभावनेने, निसर्ग आपल्याला काही देईल या भावनेने जातो. म्हणून हायकूत निसर्ग यायला हवा. अर्थात हायकूत निसर्ग येताना तो स्पष्टपणे न येता प्रतिमांच्या भाषेत यावा. हायकूत निसर्गाचे केवळ वर्णन नसावे. चांगल्या कवितेतप्रमाणे प्रतिमा हाही हायकूचा प्राण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हायकू लिहिताना कवीची मन:स्थिति हायकूसाठी पोषक झाली पाहिजे, आणि निसर्ग या बाबतीत माणसाची सर्वाधिक मदत करू शकतो. कवीने निसर्गाकडे वळले पाहिजे. पण एवढेच पुरेसे नाही; निसर्गालाही आपल्या आत प्रवेश करू द्यायला हवा. कवी एक निसर्ग दृश्य पाहतो, तो वर्तमान क्षण आणि त्यासोबतचा तपशील देखील त्याचे मन टिपून घेते. त्यांच्याशी त्याचे एक नाते निर्माण होते. गद्य लेखन करताना अनुभवापासून थोडे तरी अलिप्त, वेगळे होण्याची गरज असते. हायकू-कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो. हायकूमध्ये प्रतिमांच्या साह्याने कवी आपले म्हणणे सूचित करू पाहतो, हायकूचा निश्चित अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. ही संदिग्धता हायकूचे सौंदर्य वाढविते. शेवटी श्रेष्ठ कला ही कलावंताचा अनुभव दर्शविते, त्याने वर्णन केलेली वस्तू नव्हे. त्यामुळेच हायकूत अधिक तपशीलवार वर्णनाला जागा नसते. कवी हायकूत शब्दांचा उपयोग शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी करतो. अनुभवातून गेल्यानंतर त्याच्या मनात पुढली प्रक्रिया सुरू होते. कवीच्या मनात काही जुन्या आठवणी असतात, संस्कार असतात, त्यांच्या प्रकाशात कवी हे तपशील निरखू लागतो. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. या मंथनातून एक पुसटसा आकृतीबंध तयार होतो. तो कवीला अस्वस्थ करतो आणि तो शब्दांतून मांडण्याची अनिवार उर्मि त्याच्या मनात निर्माण होते. शब्द स्मृतीत साठवलेले असतातच, आता त्यांतून नेमके शब्द शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेची पुढली पायरी म्हणजे जे शब्दातून व्यक्त करायचे आहे त्याचा ‘घाट’ ठरविणे. हा अनुभव हायकूतून व्यक्त होऊ शकेल की त्यासाठी दीर्घ कविता लिहावी लागेल हे ठरविणे. ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते कारण हायकू लिहावयचे म्हणजे त्याचे अल्पाक्षराचे बंधन पाळावे लागते. आता शब्दांच्या वेगवेगळ्या छटा कवी न्याहाळू लागतो. त्याच्या कष्टाच्या मदतीला त्याची प्रतिभा येते व एका क्षणी हायकूचा जन्म होतो. हा क्षण केव्हा येईल याची कवीलाही कल्पना नसते. हायकू हा उस्फूर्त असतो असाही एक समज आहे, मात्र अनेक मोठ्या कवींनी आपले हायकू पुन्हापुन्हा तपासून नव्याने सादर केल्याचीही उदाहरणे आहेत. कोबायाशी ईस्साने हायकू लिहिल्यावर तीन चार वर्षांनी ते ‘दुरुस्त’ केलेले जाणकारांनी दाखविले आहेत. R H Blith या अभ्यासकाने ‘हायकू म्हणजे क्षणिक साक्षात्कार’ असे म्हटले आहे. [expression of temporary enlightenment]. मात्र हायकूचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तो क्षणिक व कालातीत यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आयूष्य हे या क्षणाला सुरू झाले नाही किंवा संपणारही नाही, हा क्षण ही काळाच्या साखळीतील एक कडी आहे हे उत्तम हायकूकार जाणतो, व ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या मालिकेतील पुढील लेखात आपण हायकूमधील रसिकाच्या/ वाचकाच्या सहभागाबद्दल विचार करणार आहो. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे या ब्लॉगवर आपण हायकू या काव्यप्रकारासंबंधी, त्याच्या रूपाकाराविषयी, अनेक श्रेष्ठ जागतिक हायकू कवी व त्यांच्या काव्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहो. मात्र ही माहिती घेण्यासाठी हायकू रसिकाला हायकूच्या व्याकरणाची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे असे समूहावरील प्रतिक्रियेतून मला जाणवले. त्यामुळे या व पुढील ब्लॉग मध्ये या विषयावर मी लिहिणार आहे. या संदर्भात मी ‘हायकूच्या विश्वात’ हे दीर्घ पुस्तक लिहिले असून येत्या काही महिन्यांत ते प्रकाशित होईल. त्यातल्या एका प्रकरणाचा हा सारांश. 1] हायकू हा जपानी काव्य प्रकार आजच्या काळात जगभर लोकप्रिय झालेला असला आणि अनेक देशांत हायकू लिहिण्याची परंपराही तयार होताना दिसत असली तरी ‘हायकू’ची सर्वमान्य व्याख्या मात्र अजून केली गेली नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की हायकूच्या आजवर ज्या ज्या व्याख्या करण्यात आल्या त्यापैकी एकही सर्वांना समाधानकारक अशी वाटलेली नाही. हायकू सोसायटी ऑफ अमेरिकाने हायकूची व्याख्या अशी केली होती: Haiku: A poem recording the essence of a moment keenly perceived, in which nature is linked to human nature. Usually a haiku in English is written in three unrhymed lines of seventeen or fewer syllables. ‘हायकू म्हणजे अशी कविता जिच्यात उत्कटतेने अनुभवलेला एक क्षण शब्दबद्ध केलेला असतो आणि तिच्यात निसर्ग आणि मानवी स्वभाव यांची सांगड घातली जाते. सहसा इंग्रजीत हायकू हे तीन निर्यमक ओळीत लिहिले जातात ज्यांत 17 किवा कमी सिलेबल्स असतात.’ ही व्याख्या हायकू सोसायटीनेच 2004 साली बदलली. नव्या व्याख्येनुसार A haiku is a short poem that uses imagistic language to convey the essence of an experience of nature or the season intuitively linked to the human condition.” या व्याख्येत सिलेबल्सच्या संख्येचा उल्लेखही नाही. Gabriel Rosenstock हा अभ्यासक लिहितो, ‘हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ [one breath poetry] आहे. ती जपानी परंपरेनुसार 17 सिलेबल्समध्ये तर, जपान बाहेर सहसा ‘मुक्त काव्य’ रूपात, तीन ओळीत लिहिली जाते. हायकुच्या संदर्भात ‘ओन’ हा शब्द सतत वापरला जातो. ही संकल्पना काय आहे हे ध्यानात घेतल्यावरच हायकूची रचना नीट समजू शकते. ‘ओन’ हे जपानी भाषेतील उच्चारांचे एकक. ‘ओन’ ही संकल्पना मराठीत नाही. वाक्य उच्चारताना जेथे एक उच्चार संपतो तेथे पहिला ‘ओन’ संपला असे धरले जाते व तेथून पुढे दूसरा ‘ओन’ सुरू होतो. जपानमध्ये अगदी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांना ‘ओन’ मोजण्याचे शिकविले जाते. एक अत्यंत महत्त्वाची सूचना प्रथमच देऊन ठेवतो. विसाव्या शतकात मराठीत हायकू लिहिताना कुणीतरी हायकूत 17 अक्षरे असली पाहिजेत असे बंधन घातले व हायकूला बंधनात टाकून हायकू लिहिणे विनाकारण अवघड करून टाकले. हायकूत अमुक एक अक्षरेच असली पाहिजेत ही चुकीची समजूत आहे. जपानी हायकूत 17 ओन मोजले जात असले तरी ओन व अक्षर यांत फार फरक आहे, त्यामुळे 17 ओनमध्ये जे सांगितले जाते ते 17 अक्षरांपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. उदाहरणार्थ, ‘तोक्यो’ मध्ये जपानी व्याकरणाप्रमाणे 4 ‘ओन’ आहेत, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 2 अक्षरे. ‘ओसाका’ मध्ये जपानी भाषेत 4 ‘ओन’, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 3 अक्षरे आहेत. त्यामुळे मराठी हायकू लिहिताना त्यात किती अक्षरे आहेत हे कवींनी किंवा वाचकांनी पाहू नये. हायकूचा एक जाणकार शिक्षक, व अभ्यासक अलन गिन्स्बर्ग याने लिहिले आहे: ‘जपानी हायकू मधील 5/7/5 ही रचना इंग्रजीमध्ये जशीच्या तशी आणता येणार नाही. फक्त ध्यानात असू द्या-‘These three lines must make the mind leap!’ मराठी कवींनीही हे ध्यानात ठेवले पाहिजे. मी माझ्या एका हायकूतून हीच भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अडीच अक्षरे प्रेमाची कशी बसवू सतरा अक्षरात अक्षरांच्या संख्येत भावना बसविण्याचा प्रयत्न केला की त्या गुदमरण्याची शक्यताच अधिक. 17 अक्षर हे बंधन पाळल्यामुळे अनेकदा मराठी हायकू अपूर्ण किवा ‘अनावश्यक कात्री लावलेला’ किंवा ‘त्रोटक’ असा जाणवतो. ही बंधने झुगारून देण्याची वेळ आली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जपानी भाषेचे स्वरूप असे आहे की 5/7/5 ओनची रचना कवितेला एक आनंददायक ताल [Rhythm] मिळवून देते. त्याची नक्कल करणे दुसर्या भाषेला शक्य नाही. म्हणून मराठी कवींनी आपला ताल आपणच शोधायला हवा.
मग हायकू किती अक्षरांचा असावा? निश्चित आकडा ठरविता येत नसला [आणि त्याची गरजही नाही ] तरी हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ आहे हे ध्यानात ठेऊन हायकुचे लेखन करायला हवे. एवढे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे की हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली, प्रतिकातून व्यक्त होणारी लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. 2] हायकू हा सामान्यपणे 3 ओळीत असावा. 3] हायकूमधील वाक्याची रचनाच अशा प्रकारे केली पाहिजे की ते वाक्य ‘कवितेचे तीन एकसंघ भाग’ वाटले पाहिजे. 4] हायकुला शीर्षक नको. जे सांगावयाचे आहे ते हायकूतून सांगावे. शीर्षकामुळे वाचकाचे विचार आधीच दुसर्या दिशेला जाण्याचा धोका असतो. 5] यमक जुळविण्याचा खटाटोप नको. बर्याच मराठी हायकूत पहिल्या व तिसर्या किंवा दुसर्या व तिसर्या ओळीत यमक जुळविलेले दिसते. त्याची आवश्यकता नाही. बहुतेक जपानी हायकूत यमकाचा वापर केला जात नाही. यमक सहज जुळून आले तर हरकत नाही पण त्याच्या आग्रहामुळे हायकुला कृत्रिम गेयता येते असे मानले जाते. Encyclopedia Britannica ने तर त्याच्या हायकुच्या व्याख्येची सुरुवातच ‘unrhymed poetic form’ अशी केली आहे. वेबस्टर dictionary मध्येही ‘an unrhymed verse form’ असाच उल्लेख आढळतो. यमक सहज जुळले तर हरकत नाही. ‘यमकामधून’ गेयता आणू नये. 6] विरामचिन्हे, अवतरण चिन्हे टाळली पाहिजेत. 7] हायकूची 17 अक्षरांची मर्यादा जर आपण नाकारली तर मग या काव्य प्रकाराची मुख्य लक्षणे कोणती? तीन ओळीतील एखादी अल्पक्षरी रचना हायकू आहे का नाही हे कसे ठरवायचे? याचा थोडा तपशीलवार विचार करू. हायकूमध्ये तीन महत्वाचे घटक असले पाहिजेत. पहिला म्हणजे निसर्गाविषयीचे प्रेम, जवळीक, निसर्गतादात्म्यता. दुसरा घटक म्हणजे, हायकूत विलक्षण सूचकता हवी. जे सांगायचे ते स्पष्टपणे मांडू नये. यामुळे उत्तम हायकू हा नेहमी विचारांच्या अनेक दिशा सूचित करणारा असतो, त्यामुळे एकाच हायकुची अनेक अर्थनिरूपणे होऊ शकतात. रचनेतील संदिग्धता ही दिखाऊ असू शकते पण अर्थातील संदिग्धता ही वैचारिक प्रवासाला आवाहन करू शकते. जी रचना एकच अर्थ स्पष्ट करू इच्छिते ती हायकू नसतेच. [किंवा कवीचा हट्टच असेल तर तिला ‘साधारण हायकू’ म्हणू.] तिसरे म्हणजे, हायकूत दोन वेगवेगळी बिंबे असायला हवीत, आणि त्यांचे नाते मांडले जावे. हे नाते पुन्हा प्रत्येक वाचकासाठी वेगळे असू शकते. 8] हायकूत म्हणी, वाक्प्रचार यांचा अंतर्भाव करू नये, जनमाणसात रूढ असलेल्या म्हणी वापरू नयेत, कारण त्यांचा एखादा वेगळा, तयार अर्थ वाचकाने लावलेला असतो, किंवा त्याच्या मनात असतो. 9] हायकूत सहसा शब्दांची पुनरावृत्ती करू नये. एकाच अर्थाचे दोन शब्द वापरणेही टाळावे. जितके शब्द कमी तितकी सूचकता अधिक. ‘अधिक माहिती देणे’ अर्थाला मर्यादित करू शकते. 10] ’शब्दांचे खेळ’[wordplay] सहसा टाळायला हवे. कधी खेळ सहज जमून गेला तर तो त्याज्य मानू नये. 11] निसर्ग,ऋतुदर्शक शब्द [ज्याला जपानी भाषेत ‘किरेजि’ म्हणतात] हायकूत आलाच पाहिजे असे नव्हे. आधुनिक माणसाला दुर्दैवाने निसर्गापासून दूर जावे लागले आहे. त्याने आजूबाजूच्या जगातूनच कवितेचे विषय शोधले तर ते हायकूला वर्ज्य नसावेत. 12] ठोस प्रतिमा वापरायला हव्या. ठोस प्रतिमा इंद्रियांना आकर्षित करतात ज्यामुळे वाचक दृश्य, वस्तु किंवा कल्पना, ध्वनि, वास, चव आणि स्पर्श यासारख्या संवेदना वेगळ्या रूपात अनुभवू शकतात. त्या विशिष्ट आणि मूर्त असतात. अमूर्त प्रतिमा टाळा, ज्या इंद्रियाद्वारे थेट जाणवत नाहीत. 13] न्यायदाते बनू नका. आपण मांडले तेच सत्य असा आग्रह धरू नये. असा आग्रह हायकूला एकांगी व कमकुवत बनवू शकतो. संदेश देण्याचा, उपदेश करण्याचा, मार्गदर्शनाचा प्रयत्न करू नये. या भूमिका हायकूकाराच्या नाहीत. 14] दुर्बोधता टाळावी. अवघड, बोजड शब्द वापरू नयेत. 15] हायकू हे सहसा पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतात कारण मानवी अनुभवाशी त्यांचा जवळचा संबंध असतो. असे असले तरी निसर्गातील घटकांवर भाष्य करताना ‘स्व’ला मध्ये येऊ देऊ नये. ‘मी’, ‘मला’, ‘माझे मत’ असे शब्द सहसा टाळले पाहिजेत. 16] हायकू मधून ‘निष्कर्ष’ सांगण्याचा प्रयत्न कवीने करू नये. तो वाचकाला काढू द्या. 17] केवळ तात्विक विचार मांडू नका. हायकूत अवघड तत्वचिंतन येऊ देऊ नका. ते मूळ रूपात काव्य आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. 18] हायकूत नकारात्मक दृष्टीकोण नको. हायकू ही आशावादी कविता आहे. ती दु:खाचे मानवी जीवनातील महत्त्वाचे स्थान मान्य करते पण दु:खाला शरण जाण्यास नकार देते. दु:खाचे अस्तित्त्व मान्य करते पण सामर्थ्य नाकारते. 19] हायकूमध्ये एक लपलेला अर्थ असायला हवा. मात्र तो स्पष्ट करण्यासाठी धक्कातंत्र वापरू नका. ‘रसिकरंजनी’ वृत्ती, अति सुलभता, सोपेपणा, स्पष्टीकरण हे सारे टाळले पाहिजे. सहजसाध्य कलाटणी टाळली पाहिजे. 20] हायकूत वर्तमानकाळच वापरावा, भूतकाळ आला तर तो वर्तमान काळाशी नाते जोडणारा असावा. जर आठवण हा आजच्या जगण्याचा भाग असेल तर ती आजच्या हायकूचाही भाग होऊ शकते. आठवणीत रमणे हे जर केवळ स्मरणरंजन असेल तर तो मनाचा भावुकपणा असू शकतो. पण आठवण असणे ही माणसाच्या जिवंतपणाचे एक लक्षण आहे. हायकूसाठी आवश्यक हे की विचारांच्या साखळीची सुरुवात आठवणीपासून व्हायला नको. आजच्या क्षणाचा एक भाग म्हणून ती आठवण मनात प्रवेश करीत असेल तर ती हायकूत येऊ शकते. 21] आत्ताच्या क्षणावर लक्ष केन्द्रित करा’ पण ‘आताचा क्षण’ ही गेलेला क्षण आणि येणारा क्षण यांच्यामधील कडी आहे हे भान कवीला असायला हवे. 22] ‘सारखे’, ‘प्रमाणे ‘ असे शब्द टाळावे. ‘तुलना’ नको. उपमा, उत्प्रेक्षा असे अलंकार नकोत. 23] प्रत्येक विषयाला ‘तीन ओळीत’ बसविण्याचा प्रयत्न नको. जर तो विषय अधिक शब्द मागत असेल तर वाटल्यास त्यावर स्वतंत्र कविता लिहा. 24] हायकूला विनोद वर्ज्य नाही, फक्त तो केवळ ‘हसविण्यासाठी’ नसावा. जपानमध्ये निखळ विनोदी हायकू देखील लिहिले जातात पण त्यांना ‘सेनर्यू’ असे नाव आहे. [याविषयी एक स्वतंत्र लेख पुढे लिहिला जाईल.] 25] हायकू लिहिताना मनाला भटकू देऊ नये. ‘विषयावर’ मन केन्द्रित करण्याचा प्रयत्न करा. हायकू लेखन ही एक प्रकारची ध्यानधारणा आहे. 26] आपल्याला हायकू लिहिता येत नाहीत असे मानून कवीने प्रयत्न सोडू नये. सकारात्मक दृष्टीकोण असू द्यावा तो तुम्हाला लेखनातच नव्हे तर जगण्यातही साथ देईल. 27] सारेच हायकू ‘नियमांनुसार’ लिहिले जातील असे नव्हे. काही हायकूत वरीलपैकी काही नियम पाळले जाणारही नाहीत. 28] एक सल्ला : हायकू लिहिल्यावर लगेच प्रकाशित करण्याची घाई करू नये. लिहीलेल्या हायकूत दुरूस्ती करणे कमीपणाचे समजू नये. अनेक श्रेष्ठ हायकूकारानी आपल्या हायकूत तो प्रकाशित झाल्यावर देखील ‘सुधारणा’ केल्याची उदाहरणे सापडतील. सारेच हायकू उत्तम लिहिले जातील असे मानू नये. अनेक महान कवींनी सामान्य हायकू लिहिले आहेत. बाशोने लिहिले आहे, ‘जर तुम्ही आयुष्यात पाच उत्तम हायकू लिहिलेत तर तुम्ही ‘हायकू कवी’ आहात; दहा लिहिले तर तुम्ही श्रेष्ठ कवी.’ सरतेशेवटी वाचकांसाठी : हायकू वाचताना प्रत्येक हायकुला थोडा वेळ द्या. पुढल्या हायकूकडे जाण्याची घाई करू नका. पहिल्या वाचनात हायकू समजला नाही तर लगेच त्याला बाद करू नका. पुन्हा किमान एकदातरी त्याच्याकडे जा. ‘रोज एक पुस्तक’ वाचणार्यांनी कृपया हायकूच्या वाटेला जाऊ नये. हायकू कवींना व वाचकांनाही खूप खूप शुभेच्छा. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक श्रेष्ठ जपानी हायकू कवि मात्सुओ बाशो हा जपान मधीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ कवीपैकी एक मानला जातो. माझाही तो अत्यंत आवडता कवि. त्यामुळे ‘हायकुच्या तळ्यात’ हा नवा ब्लॉग सुरू करताना पहिले नमन बाशोला करणे क्रमप्राप्त आहे. सुरूवातीला दिलेला हायकू हा बाशोचा सर्वाधिक लोकप्रिय हायकू आहे. बाशोच्या तळ्यात बेडकाने मारलेल्या उडीचे पडसाद चार शतके लोटली तरी अजून उमटत असतात. प्रत्येक उत्कट हायकू कवि आणि रसिक एकदा तरी त्या बेडकाच्या उडीचा आवाज ‘आपल्या पद्धतीने’ ऐकतोच, या तळ्यात डुबकी मारतोच. पण हे सारे जाणण्याआधी आपण या उडी संबंधी थोडे अधिक जाणून घेऊ. इ.स. 1686 मधील गोष्ट. जपानमधील एका लहानसा गावात अनेक कवी आणि काव्यरसिक मात्सुओ बाशो [1644-1694] या मान्यवर कवीच्या घरी जमले होते. ही घटना घडली त्यावेळी बाशोने नुकतीच वयाची चाळीशी ओलांडली असली तरी एक महत्वाचा हायकूकार म्हणून त्याची प्रसिद्धी जपानभर पसरली होती. तो हायकू या काव्यप्रकारात जे नवे प्रयोग करू लागला होता आणि जे परिवर्तन घडविण्याची त्याची इच्छा होती तिला मान्यता मिळू लागली होती. जवळजवळ दोन हजार साहित्य अभ्यासकांनी त्याला गुरू मानून त्याच्या साहित्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. सुमारे सत्तर कवींनी त्याचे शिष्यत्व पत्करले होते. जिवंतपणीच तो एक आख्यायिका बनला होता. असंख्य लोक त्याच्या दर्शनाला येत. या दिवशी अर्थातच नेहमीप्रमाणे या मैफिलीचे प्रमुखपण बाशोकडे आले होते. अशा प्रकारच्या मैफिलीत सर्वसाधारणपणे एक विषय घेऊन त्यावर हायकू लिहिण्याची पद्धत होती. आजचा विषय ‘बेडूक’ हा होता. बेडकावर अनेक कवींनी आपले हायकू सादर केले. बाशोचा एक शिष्य शिको याने या मैफिलीचे फार अप्रतीम वर्णन लिहून ठेवले आहे. तो लिहितो, ‘त्या दिवशी रिमझिम पाऊस पडत होता. बाशोच्या घराशेजारी असलेल्या तळ्यात बेडूक उड्या मारीत असल्याचा आवाज अधून मधून ऐकू येत होता.' काही काळ शांतपणे विचार केल्यावर बाशोने प्रथम 12 ‘ओन’ची रचना सादर केली. ‘ओन’ म्हणजे जपानी भाषेतील उच्चाराचे एकक. मराठीत त्याला पर्यायी शब्द नाही. शिवाय हायकुचा आस्वाद घेण्यासाठी तो ‘ओन’ ची माहिती असणे गरजेचे नाही. [ओनविषयी अधिक माहिती ओघओघाने या ब्लॉगमधून दिली जाईलच.] हायकू तीन विभागांत असतात व त्यांची रचना सामान्यपणे 5+7+5 अशी 17 ओनची असते. बाशोने लिहीलेल्या त्या 12 ओनच्या रचनेचा इंग्रजी अनुवाद असा- Frog jumps in Sound of water ... पण अजून हायकूची सुरुवात त्याला सापडत नव्हती. त्याच्या एका शिष्याने एक ओळ सुचविली. पण ती बाशोला पटली नाही. काही वेळाने त्याच्या या रचनेत ‘प्राचीन तळ्याने’. प्रवेश केला व त्याने हा हायकू असा पूर्ण केला- The old pond Frog jumps in Sound of water पुढे बाशो हे उपनाम घेतलेल्या मात्सुओ किसाकूचा जन्म उइनो या लहानशा गावी ई.स. 1644 साली झाला.. 1678 साली प्रथम त्याने नवीन वर्षाच्या कविता लिहून प्रकाशित केल्या. त्या काळी फक्त मान्यताप्राप्त कवीच असे करीत, यावरून त्याच्या कवितांना मान्यता मिळू लागली होती असे दिसते. काही तरुण त्याचे शिष्यही बनले. अशाच एका शिष्याने भेट म्हणून एक केळीचे झाड आणून त्याच्या अंगणात लावले. हे झाड कवीला आवडले, केळीच्या झाडाला जपानीत ‘बाशो’ म्हणतात. त्यामुळे यानंतर किसाकूने आपले जुने नाव टाकून ‘बाशो’ हे नाव घेतले. [एका पुस्तकात मला असा संदर्भ आढळला की ‘बाशो’ म्हणजे केवळ झाड नसून ‘फळ न येणारे केळीचे झाड’ आहे!] तसा बेडूक हा विषय ‘हायकू’ साठी नवा नव्हता. पण बेडूक हा त्याच्या ‘गाण्यासाठी’ आठवला जायचा, कवी त्याच्या आवाजाचे, त्याच्या संगीताचे, गाण्याचे वर्णन करणारे हायकू लिहीत. हे हायकू सहसा विनोदाच्या अंगाने लिहिले जात. पण त्या दिवशी बाशोने जो हायकू सादर केला त्या पद्धतीने बेडूक कधीच कवितेत अवतरला नव्हता. बाशोच्या काळात जपानी कवितेवर चीनी काव्याचा फार मोठा परिणाम होता. चिनी कवितेत सहसा बेडकाच्या ओरडण्याचे वर्णन केले जायचे. बाशोने प्रथम रसिकांचे लक्ष ‘पाण्याच्या आवाजाकडे’ वेधले. आता हा हायकू पूर्णपणे जपानी बनला. त्याने एक परंपरा मोडली, एक नवी परंपरा चालू केली. कवितेकडे [आणि जगाकडेही] बघण्याचा एक नवा दृष्टीकोण दाखवला. काही वर्षांपूर्वी मी बाशोचे सुमारे 100 हायकू [घंटेवरले फुलपाखरू’ या पुस्तकासाठी] मराठीत अनुवादित केले होते तेव्हा या हायकूचा अनुवाद असा केला होता- प्राचीन तलाव एक बेडूक उडी घेताना पाण्याचा आवाज माझ्यासारख्या ज्या वाचकाला जपानी भाषा येत नाही त्याला [दुर्दैवाने] इंग्रजी अनुवादावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मी वरील अनुवाद हा एका इंग्रजी अनुवादावरूनच केला होता. काही दिवसांपूर्वी नेटवर एका बाशो-अभ्यासकाने व संग्राहकाने या हायकूचे 32 वेगवेगळ्या आस्वादकांनी इंग्रजीत केलेले अनुवाद प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आले. त्यापैकी प्रो. उइदा यांनी केलेला एक अनुवाद असा होता- Old pond Frog jumps in Splash! ‘sound of water’ चे ‘splash’ का झाले याचा शोध घेत असताना मोठी रंजक माहिती हाती आली. मूळ जपानी हायकूचे शब्द असे आहेत- Furu ike ya kawazu tobikomu mizu no oto Furu म्हणजे प्राचीन, Ike म्हणजे तलाव, Kawazu म्हणजे बेडूक, tobikomo म्हणजे उडी मारणे, mizu म्हणजे पाणी. शेवटचा oto हा शब्द omnomatopoeic आहे. Omnomatopoeia म्हणजे The naming of a thing or action by vocal imitation of the sound associated with it. एखाद्या कृतीचे त्याद्वारे निर्माण होणार्या ध्वनिनुसार वर्णन करणे. हा धागा पकडून आता या हायकूचे भाषांतर मी नव्याने केले. पहिल्या भाषांतरात ‘एक बेडूक’ असे शब्द होते. यांतील ‘एक’ हा शब्द मला अनावश्यक वाटला. तो गाळला. नवे भाषांतर असे झाले- प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक येथून पुढे सुरुवात झाली ‘घंटेवरले फुलपाखरू’ या माझ्या जागतिक हायकूंच्या अनुवादाच्या प्रकल्पाची.
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] सर्वप्रथम हा ब्लॉग सुरू करण्यासाठी 1-2-2026 ही तारीख का निवडली याबद्दल. बरोब्बर 25 वर्षांपूर्वी, 1-2-2001 रोजी मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बँकेची नोकरी आनंदाने सोडून दिली. त्या दिवशी मी लिहिले होते-
आज 25 वर्षांनंतर हे थोडे भाबडे वाटते आहे, पण स्वप्न पाहताना माणूस थोडा भाबडा बनला नाही तर कसे? यातील बर्याच इच्छा पूर्ण झाल्या, काही झाल्या नाहीत. पण हा सार्यांचाच अनुभव असतो. एक इच्छा मात्र मनात कोठेतरी सुप्त रूपात होती, जी त्यावेळी ओठावर आली नाही. ती होती शब्दांना कधीतरी कवितेचे रूप मिळावे ही. काही दिवसांपूर्वी तीही पूर्ण झाली. हायकू माझ्या मनात वस्तीला आले.
त्यांच्या सोबत केलेल्या हायकूंच्या जगाच्या परिक्रमेची ही कहाणी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. पहिला टप्पा : पुढील रविवारी. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |




RSS Feed